खामगाव (बुलडाणा): शहरासाठी संजीवनी ठरणार्या वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रासाठी अमरावती विभागीय आयुक्तांकडून जमिनीचा ताबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या तहानेतील मोठा अडसर आता दूर झाला आहे. तथापि, या जागेच्या मोबदल्यात पालिकेला ५३ लक्ष रुपये मोजावी लागणार असल्याची माहिती आहे.सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराला ज्ञानगंगा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी वामन नगर येथे १७ लाख लिटर तर घाटपुरीमध्ये २१ लाख लिटर पाण्याची क्षमता असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत, तर खामगाव शहरात या दोन टाक्यावरून जवळपासच्या भागात पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठा अत्यल्प असल्याने नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव निदर्शनास आल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ६२ कोटी रुपयाची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली. गेल्या चार-साडेचार वर्षांंपासून या योजनेचे शिर्ला येथील मन प्रकल्पातून काम सुरू असून योजनेवर ७0 टक्के खर्च करण्यात आला आहे; मात्र या योजनेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम जागेअभावी रखडले होते. दरम्यान, पालिकेच्या महत प्रयत्नांती जलशुद्धीकरण केंद्रासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातून जागेचा ताबा मंजूर करण्यात आला आहे; परंतु यासाठी पालिकेला तब्बल ५३ लक्ष रुपयांची किंमत मोजावी लागणार आहे. खामगाव नगरअध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी पाणी टंचाईस प्रथम प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट केले. जमिनीचा आगाऊ ताबा मंजूर करण्यासाठी प्रशासनाने ५३ लक्ष रुपये किंमत निश्चित केली आहे. ही किंमत कमी करण्यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहारास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केली.
खामगाव शहराच्या पाणीपुरवठय़ातील अडथळा दूर!
By admin | Updated: November 19, 2014 01:21 IST