आधीच कोरोनाने ग्रासले, खरीप हंगाम अजून पुढे आहे. शेतातील पेरणी कशीबशी कर्ज काढून आटोपली. घरात आर्थिक चणचण असताना आणि त्यात महावितरणचा बिल भरण्यासाठी तगादा यात गरीब जनता भरडली जात आहे. नागरिक कर्ज काढून बिल भरत आहेत. ज्या नागरिकांना वीजबिल भरणे जमले नाही, त्यांची वीज जोडणी तोडली. या तीन महिन्यांच्या काळात महावितरणने १ कोटी ४ लाख रुपये जमा केले, तर ६१० वीज जोडणी तोडल्या आहेत. अजून २ कोटी २७ लाख रुपये थकीत असल्याचे बोलले जाते. चार उपकेंद्रातील एकूण २४ कर्मचाऱ्यांना दररोज २० ग्राहक शोधून त्यांच्या जोडण्या तोडण्याचे अघोषित वरिष्ठांचे आदेश आहेत, असे बोलले जाते. सध्या सुरू असलेली वीज तोडणी कार्यक्रम थांबविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
परिसरात महावितरण राबवित असलेली वीज तोडणी अभियान थांबून ग्राहकांची कुचंबणा थांबवावी आणि बिल भरण्यासाठी सवलत द्यावी.
-अनिल फेपाळे, ग्रामस्थ, रुईखेड (मायंबा)