चिखली येथून जवळच असलेल्या भानखेड येथील जनार्दन दत्तू इंगळे यांच्याकडील कुक्कुट पक्षी मृत आढळून आले. त्यामुळे बर्ड फ्लूचा प्रसार अन्य ठिकाणी होऊ शकतो म्हणून भानखेड येथून १ ते १० किलोमीटरचे क्षेत्र हे निगराणी क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. कुक्कुटपालन व्यावसायिकांनी कुक्कुटपालन करण्यासाठी कोणी बँकेकडून कर्ज घेतले आहे, तर कोणी आपल्या कष्टातून हा व्यवसाय उभा केला होता. त्याच्यावर आपले कुक्कुट पक्षी मारण्याचे आदेश प्रशासनाकडून आल्यानंतर त्याचा कुक्कुटपालन व्यवसाय संपुष्टात आला आहे. या कुक्कुटपालन व्यावसायिकांना धीर मिळावा म्हणून प्रतिकुक्कुटपक्षीचा मोबदला म्हणून प्रतिपक्षी २५० ते ३०० रुपये द्यावेत, अशी मागणी युवा स्वाभिमान पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ईश्वरसिंग चंदेल यांनी एका पत्रकातून केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा चंदेल यांनी दिला आहे.
कुक्कुटपालन व्यावसायिकांना मदत द्या -ईश्वरसिंग चंदेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:35 IST