चिखली(जि. बुलडाणा) : खरिपाची पिके हातची गेली; मात्र रब्बीच्या आशेवर असलेल्या नायगाव बु.येथील शेतकर्यांचे रोहित्र जळून १५ दिवस उलटले तरीही ती बदलून मिळत नसल्याने शेतातील पिके वाळत असल्याचे पाहून हताश झालेले शेतकरी २0 नोव्हेंबर रोजी विद्युत पोलवर चढले होते. ही माहिती मिळताच शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी नायगाव बु.गाठून संतप्त शेतकर्यांना खाली उतरविले. वीज कंपनीच्या अधिकार्यांशी संपर्क साधून याकामी पुढाकार घेत तातडीने रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पेनटाकळी प्रकल्पाच्या काठावर नायगाव बु. हे गाव वसलेले आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांची संपूर्ण मदार रब्बी पिकांवर अवलंबून आहे; मात्र ऐन पिकांना पाणी देण्याच्या वेळेस रोहित्र जळाल्याने शेतकर्यांना वारंवार महावितरणच्या कार्यालयात चकरा माराव्या लागल्या, एवढे करूनही रोहित्र बदलविण्यात न आल्याने जेमतेम डोके वर काढलेल्या रब्बी पिकांची अवस्था बिकट होत चाचली होती. दरम्यान, संबंधित विभागाच्या दिरंगाईमुळे रोहित्र जळाल्याचा रिपोर्टही उशिरा जात असल्याच्या तक्रारी असून, शेतकर्यांनी बिलाची रक्कम भरली असतानाही १५ दिवस उलटूनही रोहित्र मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकरी २0 नोव्हेंबर रोजी थेट जळालेल्या डी.पी.वर चढले. ही माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष विनायक सरनाईक, जिल्हा सरचिटणीस नितीन राजपूत यांनी तातडीने नायगाव बु. गाव गाठले व रोहित्रावर बसलेल्या शेतकर्यांना खाली उतरवून घेत त्यांना रोहित्र मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, तेथूनच वीज वितरणचे कार्यकारी अभियंता शेगोकार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून याबाबत माहिती दिली असता शेगोकार यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकर्यांना तातडीने रोहित्र बसवून दिल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दिलीप जंजाळ, विष्णू जवंजाळ, अशोक मोरे, राजू जंजाळ, धोंडूबा कापसे, पांडुरंग अंभोरे, उमेश पंखुले, सुधाकर जवंजाळ, विठ्ठल जवंजाळ, मोहन फोकाटे व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
नायगाव येथील संतप्त शेतक-यांना मिळाले रोहित्र
By admin | Updated: November 22, 2015 02:15 IST