खामगाव : तालु्क्यातील किन्ही महादेव येथील शेतमजुराचा उष्माघातामुळे २४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. या घटनेनंतर डॉक्टरांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत मृतकाच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार थांबविले होते. दरम्यान, प्रशासनाच्या आश्वासनानंतर मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. किन्ही महादेव येथील पुरुषोत्तम दशरथ तायडे (वय २१) हा शेतमजूर २० एप्रिल रोजी शेतात शेतमजुरीचे काम करीत असताना चक्कर आल्याने बेशुद्ध झाला. हा प्रकार उपस्थित नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी पुरुषोत्तम तायडे यास उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, पुरुषोत्तम तायडे यास उष्माघात कक्षात दाखल करण्यात आले नव्हते. उपचारादरम्यान प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, अकोला येथे उपचार सुरु असताना २४ एप्रिल रोजी सकाळी पुरुषोत्तम तायडे याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृतकाच्या नातेवाईकांनी पुरुषोत्तमवर उपचारादरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप करीत अंत्यसंस्कार थांबविले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार कुणाल झाल्टे, हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार डंबाले आदींनी किन्ही महादेव येथे जाऊन चौकशी करुन दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. यानंतर मृतकावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले. पुरुषोत्तम तायडे हा बुलडाणा जिल्ह्यातील उष्माघाताचा यावर्षी पहिला बळी ठरला आहे.
शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू
By admin | Updated: April 25, 2017 00:22 IST