खामगाव : एकात्मीक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत शेतकरी, शेतमजूर व स्वंयसहाय्यता महिला बचत गटांना उद्योगासाठी तसेच सर्वागीण विकासासाठी कृषी विभाग फिरते भागभांडवल उपलब्ध करुन देणार आहे. या कार्यक्रमात खामगाव तालुक्यातील ११ गावांचा समावेश असून १७४ बचतगटांना १ कोटी ६0 लाखाचे अर्थसहाय्य मिळणार आहे.लोकसहभागातून पाणलोट क्षेत्र विकास व शाश्वत उपजिवीका सुरक्षिततेच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमामध्ये शेतकर्यांबरोबरच भुमिहीन, बचत गटांना अर्थसहाय्य करुन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे धोरण कृषी विभागाने ठरविले आहे. राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या वतीने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम हा २0११-१२ ते १५-१६ पर्यंत राबविल्या जाणार आहे. या कार्यक्रमात खामगाव तालुक्यातील बोरी, बोथाकाजी, शहापूर, देऊळखेड, लोणीगुरव, दस्तापूर, अडगाव , गवंढाळा, आसा दुधा, आंबेटाकळी व कंचनपूर या गावांचा समावेश आहे. या गावातील ७ हजार ७११ हेक्टर क्षेत्रावर सामूहिक आराखड्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. तालुक्यात आतापर्यंत जवळपास २ हजार हेक्टर क्षेत्रावर ढाळीच्या बांधाचे कामे केली आहेत. शेतकर्यांच्या आर्थीक उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने शेतकर्यांच्या सुक्ष्म सिंचन क्षेत्र वाढीसाठी शेतातील पाण्याचा वापर महत्वाचा ठरणार असून पाणी बचतीने ** सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर दिल्या जाणार आहे.ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता शेतकर्यांबरोबरच भुमिहीन तसेच बचत गटांना समविचारी व एका विषयाने प्रेरीत असलेल्यांना उद्योग करावयाचा आहे. उद्योगासाठी फिरते भांडवल कृषी विभाग उपलब्ध करुन देणार असून कृषी विभागाच्या मध्यस्तीने बँक कर्जाऊ स्वरुपात भांडवल देणार आहे. पाच वर्षाच्या कालावधीत उद्योगासाठीची रक्कम परत करावयाची आहे. कृषी विभागाच्या वतीने समूह संघटक जयदेव राजनकर, मंगेश अढाव व कृषी तज्ञ विजय भागवतकर मार्गदर्शन करणार आहेत.
बचत गटांना मिळणार अनुदान
By admin | Updated: July 8, 2014 23:36 IST