खामगाव (जि. बुलडाणा): शेतकर्यांप्रती केंद्र व राज्य सरकार अतिसंवेदनशील आहे. अनेक हितकारी निर्णय सरकारने घेतले आहे. शेतकर्यांच्या विकासासाठी सरकारच्या योजना प्रत्येक शेतकर्यांपर्यंत पोहचवा, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. स्थानिक भाजप कार्यालयात खामगाव तालुका व शहर भाजपाच्यावतीने ना. पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. भाऊसाहेब फुंडकर, आ. अँड. आकाश फुंडकर, खविसंचे अध्यक्ष बाबुरावसेठ लोखंडकार, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुरेशआप्पा खबुतरे, नंदकिशोर अग्रवाल, संतोष देशमुख, चंद्रशेखर पुरोहित आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार प्रभावीपणे व गतीने सर्व क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. शेतकरी व तरुण वर्गासाठी अनेक प्रभावी योजना सरकारने आणल्या आहेत. याचा फायदाही त्यांना होत आहे; परंतु आजही सामान्य शेतकर्यांपर्यंत योजना पोहचल्या नाहीत. प्रशासनाप्रमाणे आपलेही त्यांच्यापर्यंत सर्व योजना पोहचविणे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकर्यापर्यंंत योजना पोहचवा, तरुणांना उद्योग क्षेत्राकडे वळवा, प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी आ. भाऊसाहेब फुंडकर व आ.अँड. आकाश फुंडकर यांनी खामगाव मतदारसंघाच्यावतीने ना. पाटील यांचे स्वागत केले.
शेतक-यांप्रती सरकार अतिसंवेदनशील- पाटील
By admin | Updated: May 16, 2016 01:23 IST