गेल्या आठ महिन्यांत तब्बल १६७ घरफोड्या
सुरू असलेल्या वर्षात कोरोना कालावधीत अनेक कुटुंबांना कोरोनाची बाधा झाल्याने ते उपचार घेत असताना त्यांच्या बंद घराची कुलुपे तोडून त्यांच्याही घरी घरफोड्या झाल्या. वाढती बेरोजगारी, त्यात कोरोना संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. वाढती महागाई आणि हाताला काम नाही. परिणामी, जबरी चोऱ्या, किरकोळ चोऱ्या, घरफोड्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. त्याचा ताण पोलीस दलावर वाढू लागला आहे. जिल्ह्यात या आठ महिन्यांत १६७ घरफोड्या झाल्या आहेत.
कोणत्या वर्षात किती घरफोड्या
वर्ष : घरफोड्या - उघडकीस
२०२० : १६३ - ४४
२०२१ : १६७ - ३४
१३३ घटनांचा अद्यापही तपास सुरू
जिल्ह्यात चालू वर्षात १६७ घरफोड्या झाल्या. यामध्ये ३४ घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याची टक्केवारी ही २० टक्के असून, उर्वरित १३३ घटनांचा तपास अद्यापही सुरू आहे. तेव्हा पोलिसांसमोर या घटना उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान आहे.
अनलॉकनंतर वाढल्या घटना
कोरोनानंतर सुरू करण्यात आलेल्या अनलॉकनंतर जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये ७६७ चोऱ्या झाल्या असून, यामध्ये २१९ घटना उघडकीस आणल्या आहेत. मात्र, पोलिसांचे या चोरट्यांवर लक्ष असून, अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.