चिखली : सध्या महाराष्ट्रभर नाफेडची तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांची तूर गेल्या दोन महिन्यांपासून नाफेडच्या केंद्रावर वजन मापाच्या प्रतीक्षेत पडून आहे. अशा प्रतीक्षेतील शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे नाफेडला म्हणजेच शासनाला शक्य नसल्यास, त्या शेतकऱ्यांना शासकीय हमी भाव व बाजारभाव यातील फरक साधारणत: १ हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात यावा, अशी मागणी चिखली बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.सध्या बाजारात तुरीला सरासरी ४ हजार रुपये भाव देण्यात येत आहे. हमीभावानुसार ही तफावत १ हजार रुपयांची असल्याने ती तफावत जर शेतकऱ्यांना शासनाने दिली तर सर्व प्रश्न मिटू शकेल. शिवाय नाफेडवरील गैरसोय व गैरप्रकारही टाळले जातील. तर नाफेडने आता खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आपली तूर नाइलाजाने खुल्या बाजारात विकावी लागणार व त्यांना प्रति क्विंटल १ हजार ते १२०० पर्यंत नुकसान सोसावे लागणार असल्याने या मागणीचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. खरेदी केंद्रावर आलेली सर्व तूर खरेदी करण्याचे नाफेडने ठरविले, तरी खरेदी करण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे, तर चुकारा मिळण्यासाठी त्यापुढील चाळीस ते पन्नास दिवसांचा कालावधी लागणार आहे. या प्रक्रियेला लागणारा वेळ पाहता पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांकडे पैसेच राहणार नाहीत, तसेच पेरणीपूर्वी कर्ज भरणा करायचा कसा, मुलांचा शैक्षणिक खर्च असे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत, तर सद्यस्थितीत खरेदी केंद्रावर उघड्यावर टाकलेली तूर प्रखर उन्हामुळे जीर्ण होत आहे. त्यातच पुढच्या महिन्यात अवकाळी पावसाचाही धोका आहे. त्यामुळे या सर्व बाबीवर तोडगा म्हणून खरेदी केंद्रावर आणलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये भाव फरक दिल्यास प्रक्रिया खर्च व कालावधीची बचत होऊन शेतकऱ्यांची होणारी परवड थांबण्यास मदत होईल व शासनावरसुद्धा कमी भार पडेल, त्यामुळे सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा व शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये भाव फरक द्यावा, अशी मागणी सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी केली आहे.
तुरीला एक हजार रुपये बाजार भाव फरक द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 00:18 IST