बुलडाणा : आपली व कुटुंबीयांची दिशाभूल करून तसेच जिवे मारण्याच्या धमक्या देऊन देऊळघाट येथील मो. जावेद अब्दुल वहाब याने जबरदस्तीने लग्न केले. त्यानंतर अत्याचार करून सहा महिने शारीरिक छळ केला, अशी तक्रार येथील ज्योत्स्ना अशोक नागरे या महिलेने दिल्यावरून बुलडाणा पोलिसांनी मो. जावेद याच्याविरुद्ध विविध कलमान्वये बुधवारी गुन्हे दाखल केले. शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत सदर महिलेने गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली आपबीती कथन केली. देऊळघाट येथील मो. जावेद अब्दुल वहाब याने आपल्याला भूलथापा देऊन जबरदस्तीने औरंगाबाद येथे घेऊन गेला आणि ३१ मे २0१४ रोजी आपल्यासोबत निकाह लावला. त्यानंतर देऊळघाट येथे आणले. येथे आपल्याला जावेद व त्याचे कुटुंबीय सतत मारहाण करीत होते, तर जावेद हा शारीरिक शोषण करीत होता. त्यांच्या छळाला कंटाळून आई-वडिलाकडे पळून आले; मात्र जावेद घरी येऊन आपल्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. त्याच्या भीतीने संपूर्ण कुटुंब दहशतीखाली होते, असे ज्योत्स्नाने सांगितले. अखेर शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांना हा प्रकार सांगीतला. त्यांनी पोलीस स्टेशनला नेऊन मो. जावेद याच्याविरोधात तक्रार द्यावयास लावली. त्यानुसार त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले, असे ज्योत्स्नाने स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला संजय गायकवाड, महिला आघाडीच्या सिंधूताई खेडेकर, माजी नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड, अँड. अमोल बल्लाळ तसेच ज्योत्स्नाचे आई-वडील उपस्थित होते.
जबरदस्तीने लग्न; इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Updated: July 31, 2015 00:23 IST