बुलडाणा : तालुक्यातील ग्राम पिंपरखेड येथील सीमा सुरक्षा बलमध्ये कार्यरत २६ वर्षीय जवान आणि त्याची १९ वर्षीय पत्नी या दोघांचा राहत्या घरात आगीत जळून मृत्यू झाला. ही घटना २५ मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. पिंपरखेड येथील संदीप महादेव धनवटे हा सशस्त्र सीमा सुरक्षा बलात बिहार येथील किशनगंज येथे जवान म्हणून कार्यरत होता. चिखली तालुक्यातील आंधई गावातील रूपाली (१९) हिच्या सोबत सहा महिन्यांपूर्वी संदीपचा विवाह झाला होता. विवाहासाठी घेतलेल्या सुट्या संपल्यानंतर संदीप कर्तव्यावर परत गेला नाही, त्यामुळे सीमा सुरक्षा बलाने वारंट काढून बुलडाणा पोलिसांना पत्र देऊन संदीपला किशनगंज येथे हजर करण्याचे सांगितले. यानंतर बुलडाणा पोलीस दलाने संदीपला कर्तव्यावर हजर केले होते; मात्र १९ मार्च रोजी संदीप पुन्हा परत पिंपरखेड येथे पळून आला. या दरम्यान गावातील बर्याच मंडळीने त्याला कर्तव्यावर जाण्याचा सल्ला दिला; मात्र तो जाण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान, घटनेच्या दिवशी २५ मार्च रोजी संदीप दिवसभर गावातून फरार होता. रात्री १0 वाजता तो घरी परतला, तेव्हा पत्नी रुपाली आणि त्याची आई घरात झोपल्या होत्या. रुपालीला उठवून तो दुसर्या खोलीत घेऊन गेला. रात्री १२ वाजेच्या सुमारास गावातील एका व्यक्तीने त्यांच्या खोलीतून धूर निघताना पाहिले. दरम्यान, संदीप व रुपाली दोघेही आगीत होरपळल्याचे दिसल्यानंतर तत्काळ या घटनेची माहिती बुलडाणा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. यावेळी प्रभारी ठाणेदार निचल दल आपल्या पथकासह घटनास्थळी दखल झाले. तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पोलिसाच्या उपस्थितीत २६ मार्च रोजी दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दोघांचा मृत्यू आगीत होरपळून झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले. अधिक तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस करीत असल्याची माहिती प्रभारी पोलीस ठाणेदार निचल दल यांनी दिली.
पती-पत्नीचा आगीत जळून मृत्यू
By admin | Updated: March 27, 2015 01:41 IST