गिरीश राऊत / खामगाव (जि. बुलडाणा): गतवर्षी २0१३-१४ मधील रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकाचे नुकसानीपोटी जिल्ह्यातील २११३ शेतकर्यांना रुपये ६६ लाख ३१ हजार ६३१ रुपयांचा पीकविम्याचा दावा मंजूर झाला आहे. सदरची रक्कम लवकरच शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून, या भरपाईमुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी येणारे नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान होते. यामुळे ज्याचे सर्वकाही शेतीपिकावरच अवलंबून आहे. अशा शेतकर्यांसमोर वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे संकट उभे राहते. यामुळे शेतकर्यांना शासन मदत देत असले तरी जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी काही वर्षांंपासून शासनाच्या अनुदानातून तसेच काही अंशी रक्कम शेतकर्यांकडून घेऊन पीकविमा उतरविला जातो. याच योजनेतून २0१३-१४ च्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील २५७२ शेतकर्यांनी गहू व हरभरा पिकाचा विमा कृषी विभागामार्फत विमा कंपनीकडे उतरविला होता. यापोटी १९ लाख १५ हजार ४१५ रुपयांची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे भरली होती. तर याच वर्षी नैसर्गिक संकट येत गारपीट तसेच वादळी वार्यामुळे जिल्ह्यात अनेक भागातील गहू व हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा मंडळनिहाय सर्व्हे महसूल तसेच कृषी विभागाच्या अधिकार्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत देण्यात आली सोबतच या नुकसानीच्या आधारे शेतकर्यांनी काढलेल्या पीकविम्याचा दावासुद्धा मंजूर झाला आहे, त्यामुळे जिल्ह्यात ज्या भागात नुकसान झाले तसेच ज्या शेतकर्यांनी विम्याची रक्कम भरली होती अशा जिल्ह्यातील एकूण २११३ शेतकर्यांचा पीकविम्याचा दावा मंजूर झाला आहे., त्यामुळे ६६ लाख ३१ हजार ६३१ रुपये नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रब्बी हंगामात ज्या शेतकर्यांचा पिकविमा दावा मंजूर झाला असल्याचे स्पष्ट केले.
शेतक-यांना रब्बी पीकविम्याचा दावा मंजूर
By admin | Updated: January 22, 2015 00:32 IST