बुलडाणा : शहरातील टपरीधारकांचे अतिक्रमण उठविल्यानंतर बेरोजगार झालेल्या टपरीधारकांनी १७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. अतिक्रमण हटाव मोहिमेत ज्या अतिक्रमकांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यांना देण्यात येणार्या गाळ्याचे मालमत्ता करात एक वर्षांची सूट देण्यात यावी, या व इतर मागण्या घेऊन गांधी भवन येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी झाडे यांना निवेदन सादर करून चर्चा केली. तब्बल अर्धा तास जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी अतिक्रमकांच्या समस्या व त्यांवर काय तोडगा निघू शकतो, यावर चर्चा केली. यावेळी प्रकाश देशलहरा, नीलेश भुतडा, भगवान एकडे, कुणाल पैठणकर यांनी अतिक्रमकांची बाजू मांडली. यावेळी जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी सकारात्मक तोडगा काढू, अशी ग्वाही दिली.
अतिक्रमकांचा मोर्चा
By admin | Updated: December 18, 2015 02:27 IST