देऊळगाव राजा : तालुक्यातील डिग्रस बु. येथे दूषित पाण्यामुळे पोटात मुरडा व अतिसाराची लागण झाल्याचा गंभीर प्रकार गत चार दिवसांपासून सुरू असून, आतापर्यंत २५२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. दरम्यान, ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे.मागील आठवड्यात संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पातून नदीत पाणी सोडण्यात आले. सदर पाणी डिग्रस येथील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत आले व ग्रामपंचायतमार्फत गावात नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर अनेकांना पोटात मुरडा येऊन अतिसाराची लागण झाली. यानंतर ग्रामसेविका लता अरबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर गीते, डॉ.अमोल दहिफळे यांनी उपाययोजना राबविण्यास प्रारंभ झाला. आतापर्यंत २५२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. रविवारी आठ रुग्णांवर आरोग्य विभागामार्फत उपचार करण्यात आले. ग्रामपंचायतमार्फत सार्वजनिक विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले. दवंडी देऊन पाणी पिण्याच्या वापरात येऊ देऊ नका म्हणून खबरदारीचा इशारा देण्यात आला. आरोग्य विभागामार्फत साथरोग कक्ष २४ तास कार्यान्वित करण्यात आले. घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. पाणी शुद्धीकरणाचे औषध घरोघरी वितरित करण्यात आले. नागरिकांनी दूषित पाणी पिल्याने पोटात मुरडा व अतिसाराची लागण झाली. सदर प्रकाराला जबाबदार कोण? याची चौकशी होणे गरजेचे असून, साथ आटोक्यात आणण्यासाठी अजूनही प्रभावी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे.रुग्णांच्या यादीत सरपंचासह सदस्यही दूषित पाण्याचे बळी ठरलेल्या २५२ ग्रामस्थांनी डिग्रस आरोग्य उपकेंद्रात उपचार घेतले. यामध्ये सरपंच सै. बीबी सै. लतीफ, ग्रामपंचायत सदस्य शोभा गुलाबराव पऱ्हाड, भगवान पऱ्हाड यांचा समावेश आहे.
डिग्रस बु. येथे २५२ अतिसाराचे रुग्ण
By admin | Updated: May 1, 2017 01:06 IST