चिखली : आपण निर्माण केलेल्या कलाकृतींचा मोह सोडणे, त्या कलाकृतीच्या प्रेमात न पडणे., आपण केलेल्या कलाकृतींची कुणी प्रशंसा केल्यावर जर आपण त्या कलाकृतीच्या प्रेमात पडलो तर आपण ति थेच थांबलो आणि संपलो असे समजावे. आपण निर्माण केलेल्या कलाकृतींच्या मोह सोडून जर नवनवीन कलाकृतीकडे आपण वळत राहिलो तर निश्चितच यशस्वी व्यक्तिमत्व घडल्याशिवाय राहणार नाही, असे विचार सुप्रसिद्ध हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले. स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाच्या सांगता समारोहात विशेष पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी अमरावती विद्यापीठाचे अभियांत्रिकी विद्याशाखाचे अधिष्ठाता डॉ.जी.आर. बामनोटे, प.रा. मौनीबाबा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.व्ही.आर. यादव, विश्वस्त सिद्धेश्वर वानेरे, आत्माराम देशमाने, प्राचार्य डॉ. अरुण नन्हई, प्राचार्य डॉ. के.आर. बियाणी, प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, डॉ. एस.व्ही. आगरकर, डॉ. आर.पी. चोपडे, डॉ.आर.जी. कोकाटे, प्रा. नीलेश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी डॉ. जी.आर. बामनोटे यांनी रोजगार ही आजची समस्या नसून, कुशल मनुष्यबळाची कमतरता ही आजची समस्या आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:मध्ये विविध कौशल्य विकसित करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अरुण नन्हई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवी राजभुरे यांनी तर आभार नवनाथ खर्चे, किशोर कोरडे यांनी मानले.
मोह सोडल्यास यश निश्चित- गणेशपुरे
By admin | Updated: January 14, 2015 00:36 IST