शेगाव: वैशाख मे महिन्याचे कडाक्याचे ऊन त्यातच दाट लग्नतिथीने नातेवाईक व इष्टमित्रांची लग्नघाईत मोठी धावपळ होत असल्याचे चित्र आहे. लग्नघाईत एकाच दिवसात नातेवाईक, इष्ट मित्रांची चार-पाच ठिकाणी हजेरी लावताना मोठी तारांबळ उडत आहे. नातेवाईक इष्टमित्रांचे संबंध चांगले टिकवून ठेवण्यासाठी लग्नकार्यात हजेरी लावणे आवश्यक व गरजेचे असल्याने चार-पाच ठिकाणी लग्नात हजेरी लावताना मोठी दमछाक होत आहे. त्यातच अधिकच लग्नकार्य असल्याने कोठे भेटी घेत हजेरी लावून जेवण टाळले जात आहे. त्यातच लग्नाच्या वेळेस डिजेमुळे दोन-दोन तीन-तीन तास उशिरा पुढे ढकलले जात असल्याने नियोजन कोलमडून पडत आहे. वधूकडील मंडळी व वर्हाडी मोठय़ा प्रमाणात येतील म्हणून स्वयंपाक जास्त करुन ठेवत आहे. उशिरा व ऊन त्यातच दुसर्या कार्यात जाण्याच्या कारणाने स्वयंपाक शिल्लक पडून वाया जात आहे. एकूण लग्नघाईत नातेवाईकांची धावपळ सुरु आहे. लग्नसराई म्हणजेच आनंद, पैशांचा चुराडा व हौस यातूनच विविध रोजगार निर्माण होऊन कमाई होते. वधू पाहण्यापासून खर्चाला सुरुवात होते. ये-जासाठी वाहन, चहापाणी खर्च, मुलगी वधूच्या हाती पैसे देणे, कुंकू-टिळा लग्नापयर्ंत विविध खर्च, किराणा, वाहन, कपडेलत्ते, भांडी, फर्निचर परंतु हौस म्हणून नवरदेवाचे वाहन, सजावट करणे पूर्वी केवळ थर्माकोलचे पोस्टर लावून वर-वधूचे नाव दुल्हन हम ले जायेंगे किंवा हे बंध रेशमाचे लावल्या जायचे. परंतु यात मोठे बदल झाले असून पोस्टरबरोबरच चमकी, फुले, बुके, विविध सजावट करण्यात येत आहे. तर लग्नकार्यासाठी डोलीबाजा किंवा डिजे हमखास लावण्यात येते. त्याशिवाय लग्नकार्य पार पडणे अशक्य आहे. सध्या लग्नसराईचा हंगामच सुरू आहे. यात व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. या लग्न कार्यातून अनेक व्यवसाय फुलले आहेत. मात्र दिवसाला दोन-तीन लग्न येत असल्याने हजेरी लावताना चांगलीच धावपळ होत आहे. तर दाट लग्नसराईमुळे बसेसवर गर्दी राहत आहे. तर प्रासंगिक करारामुळे बसेस सुध्दा कमी आहेत.
दाट लग्नतिथीने धावपळ
By admin | Updated: May 20, 2014 23:50 IST