बुलडाणा: बारा बलुतेदारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी १५ वर्षापूर्वी राज्य शासनाने अर्थसहाय्य योजना राबविली; परंतु तत्कालीन जिल्हा उपनिबंधक व जिल्हा सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी संगनमत करून या योजनेत अपहार केला असून, याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बारा बलुतेदार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनात नमूद आहे की, सन २००२-०४ च्या दरम्यान तत्कालीन राज्य सरकारने राज्यातील बारा बलुतेदारांच्या उन्नतीसाठी विशेष अर्थसहाय्य योजना राबविली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला त्या-त्या जिल्ह्यातील बलुतेदारांच्या व्यवसायांना पतपुरवठा करण्याचे निर्देश तत्कालीन सहकार आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले होते; मात्र जिल्हा उपनिबंधक व जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी या योजनेच्या उद्देशाला हरताळ फासला. या योजनेतून जिल्ह्यात ५८ लाभार्थींना प्रत्येकी ३० हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात आले; मात्र यापैकी केवळ ५ लाभार्थी खरे बलुतेदार आहेत. उर्वरित ५३ महिला लाभार्थींपैकी १० महिला केडर अधिकाऱ्यांच्या पत्नी, ४ जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पत्नी, ६ पतसंस्था कर्मचाऱ्यांच्या पत्नी, ३० लाभार्थी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांच्या पत्नी, १ लाभार्थी तालुका उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याची पत्नी तर २ लाभार्थी पाडळी येथील संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पत्नी असल्याचे नमूद करून ५३ लाभार्थी बोगस असल्यामुळे या योजनेत अपहार झाल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
बारा बलुतेदार अर्थसहाय्य योजनेत अपहार झाल्याची तक्रार
By admin | Updated: May 2, 2017 23:28 IST