महावितरणकडून मुंबई वगळता राज्यभरात घरगुती, वाणिज्यिक, औद्याेगिक व कृषी ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. वीज वापराच्या मोजमापासाठी ग्राहकांच्या घरात मीटर बसविले जाते. मीटर रीडिंगनुसार वीज बिलाची आकारणी केली जाते. काही ग्राहक वीज बिल चुकविण्यासाठी चक्क मीटरमध्येच फेरफार करतात. नंतर वीजचोरी पकडली गेल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५, १३८ व १२६ अंतर्गत गुन्हा दाखल करून वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो.
मीटर जप्ती व मोठा दंड
वीजचोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. एखाद्या ग्राहकाकडे वीजचोरी पकडली गेल्यास त्याला चुकविलेल्या वीज बिलाची रक्कम, दंड व तडजोडीची रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात येतो. तो स्वीकारल्यास अशा ग्राहकाचा वीजपुरवठा पुन्हा बहाल केला जाऊ शकतो. तथापी, तडजोडीचा प्रस्ताव स्वीकारला नाही, तर मीटर जप्त करून कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.
कधीही होऊ शकते मीटरची तपासणी
विद्युत चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणची पथके सदैव दक्ष असतात. एखाद्या ठिकाणी वीजचाेरी होत असल्याची शंका आल्यास किंवा कुणी गुप्त माहिती दिल्यास ही पथके संबंधित व्यक्ती, उद्योग अथवा व्यावसायिक प्रतिष्ठानावर छापा टाकून मीटरची तपासणी करू शकतात.
वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्याविरुद्ध कारवाई
२०२० आणि २०२१ या वर्षात वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या ७२४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एक कोटी पाच दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
वीजचोरी हा कायद्याने गुन्हा असून, त्यासाठी शिक्षेची तरतूदही आहे. मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळल्यास अशा ग्राहकांविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते.
- विकास बांबल, व्यवस्थापक, वित्त व लेखा, महावितरण.