धाड (बुलडाणा): कोट्यावधी रूपये खर्च करून धाड येथे उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाची आवस्था सध्या दयनीय झालेले असून डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा कारभार केवळ कंत्राटी डॉक्टरांच्या भरवशावर सुरू आहे.याचा फटका रुग्णांना बसत असून ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना रेफर टु बुलडाणा शिवाय पर्याय नाही. सुमारे ४२ गावांच्या लोकांना आवश्यक आरोग्य सुविधा या रुग्णालयातून मिळतील आणि त्याचा लाभ गोरगरीब जनतेला होईल ही रास्त अपेक्षा व उद्देश मात्र धुळीस मिळाला आहे. एकुण ३४ अधिकारी व कर्मचारी वर्गाचा या रुग्णालयाचा स्टाफ असून पैकी केवळ १३ कर्मचारी पदे कायम पदावर नियुक्त असून १0 पदावर कंत्राटी कर्मचारी आहेत. तर इतर पदे गेल्या १0 वर्षापासून रिक्त आहे. या रुग्णालयात सध्या डॉ.आर.डब्ल्यु.खरात, डॉ.ए.ए.वैद्य व एम.एम.सौदागर हे तीन जणच रुग्णालयाचा कारभार पाहत आहेत. परंतु वरीष्ठांनी या बाबत कुठलीच कार्यवाही केली नसून येथे आवश्यक डॉक्टरांची भरती केलेली नाही. परिणामी रुग्णांचे येथे हाल होत आहे. सध्या परिसरात साथ आजाराच्या रुग्णां त वाढ असून येथील ग्रामीण रुग्णालयात जबाबदार डॉक्टर्स नसल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
कंत्राटी डॉक्टरावर रुग्णाचा भार
By admin | Updated: October 25, 2014 23:39 IST