- अनिल गवईखामगाव - स्थानिक महेबूब नगराकडे जाणाऱ्या पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलाखाली साचलेल्या कचऱ्यामुळे नाल्यातील सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. परिणामी विविध आजारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी सकाळी नगर पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी यांना सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले की, नगर पालिका प्रशासनाकडून महेबूब नगर आणि परिसरातील वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नाहीत. गत कित्येक दिवसांपासून शहरात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शहरात विविध साथीचे आजार बळावत आहेत. महेबूब नगरातील पुलाची दुरवस्था आली असून या पुलाखाली साचलेल्या कचऱ्यामुळे या भागातील नागरिकांच्या घरात दूषित पाणी शिरते. त्यामुळे महेबूब नगर आणि चांदमारी परिसरातील स्वच्छतेची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश सोनोने यांच्या नेतृत्वात आयोजित मोर्चात शे. अकील, नईम भाई हबीब खान सदर, शहीद भाई, शे.शब्बीर, अजमल खान, रहीम भाई, शेरू भाई, मो. साबीर, शे. मुश्ताक, शे. लियाकत, आरिफ भाई, रईसभाई आदी सहभागी झाले होते. येत्या १५ दिवसांच्या आत या भागातील समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून पालिकेत तीव्र निदर्शनेही करण्यात आली.