बुलडाणा : मागील ४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुका ३१ ऑगस्ट व ९ सप्टेंबर रोजी होऊ घातल्या आहेत. यामध्ये ३१ ऑगस्ट रोजी २२८, तर ९ सप्टेंबर रोजी उर्वरित २९३ ग्रामपंचायतींचे कारभारी ठरणार आहेत. ऑगस्ट महिन्यात मुदत संपलेल्या २२८, तर सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्या २८८ आणि ऑक्टोबरमध्ये मुदत संपणार्या पाच अशा ५२१ ग्रामपंचायतींपैकी ४९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ४ ऑगस्ट रोजी पार पडल्या. यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या खामगाव तालुक्यातील ६८ होत्या, तर चिखली तालुक्यातील ५५, बुलडाणा तालुक्यात ४८, देऊळगावराजा २६, सिंदखेडराजा ४१, मेहकर ३४, लोणार १६, मलकापूर ३२, मोताळा ४६, नांदुरा ४३, शेगाव ३४, जळगाव जामोद २३, संग्रामपूर तालुक्यातील २७ अशा ४९३ ग्रामपंचायतींचा समावेश होता. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकांमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गावागावात असलेले गटातटाचे राजकारण आणि राजकीय प्रतिष्ठा यातून हार-जीतचा एक अध्याय आटोपला. या निवडणूका होऊन तब्बल एक महिना उलटला. या एक महिन्यात सरपंचपदासाठी अनेकांनी गावागावांत फिल्डिंग लावल्या होत्या. सदस्य फोडाफोडीचे राजकारण झाले. अनेकांनी सदस्यांना सहलीवर पाठविले. सोमवारी हे सदस्य सरपंच-उपसरपंच पदासाठी मतदान करण्यास हजर राहतील. यानंतर जिल्ह्यातील २२८ ग्रामपंचायतीचे कारभारी ठरतील.
सोमवारी ठरणार २२८ ग्रामपंचायतचे कारभारी
By admin | Updated: August 31, 2015 01:28 IST