५ मार्चपर्यंत स्पर्धेचे निकष पूर्ण करणाऱ्या गावांमध्ये सिंदखेड, दाभा, उबाळखेड, वारुळी, भोरटेक, शेलापूर खुर्द, चिंचखेड नाथ, महाळुंगी जहागीर, तिघ्रा या गावांचा समावेश आहे. या मिनी स्पर्धेमध्ये हंगामनिहाय पीक लागवड सर्वेक्षण, विहीर व बोअरवेल गणना, रब्बी व बारमाही पिकांसाठी जलबचतीच्या साधनांचा वापर, किमान १० विहिरींच्या पाणी पातळीचे मोजमाप, वृक्ष लागवड व संवर्धन,
पर्जन्यमापक बसविणे व पावसाच्या नोंदी ठेवणे,
संरक्षित कुरणक्षेत्र निश्चित करणे, स्वयंसहायता समूह सभासदत्व, जुन्या रचनांचे सर्वेक्षण, स्वच्छ पेयजल अशी दहा कामे यामध्ये करावयाची होती. दरम्यान, पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या गावांचा जिल्हास्तरावर सन्मानही करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत एकूण १३ गावे पात्र ठरली आहेत व उर्वरित ७ गावे सध्या कामे करीत आहेत. सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा दोन टप्प्यात विभागली असून मिनी स्पर्धेचा पहिला टप्पा मार्चमध्ये पूर्ण होत आहे. स्पर्धेत सहभाग घेत असलेल्या गावांमध्ये मिनी स्पर्धेचे निकष पूर्ण करण्याकडे गावकऱ्यांचा कल असून महिन्याच्या अखेरीस उर्वरित ७ गावे सुद्धा पात्र ठरतील अशी माहिती पाणी फाऊंडेशनचे मोताळा तालुका समन्वयक ब्रह्मदेव गिऱ्हे यांनी दिली.