प्रकल्प कोरडा : महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील गावे प्रभावितचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील गावांगावात नळयोजना असल्याने पाणी टंचाई नसली तरी बावनथडी नदीचे पात्र आटल्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती गावात भीषण पाणी टंचाई सुरु झाली आहे. यामुळे राजीव सागर प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची ओरड गावात आहे.सिहोरा परिसरात वैनगंगा नदीपात्रात धरणात पाणी अडविण्यात आल्याने नळ योजनांना संजीवनी मिळाली आहे. परंतु बावनथडी नदीचे पात्र यात अपवाद ठरले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस या नदीचे पात्र पूर्णत: आटले आहे. या नदीच्या काठावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याचे सीमावर्ती गावे असून पात्रात गावांना पाणी पुरवठा कारणाऱ्या नळ योजनांचे पंपगृह आहेत. नदीपात्रात पाणीच नसल्याने नळयोजनांचे पंपगृह अडचणीत आले आहे. या शिवाय पाल्याची पातळी खोलवर गेल्याने गावातील विहिरी आणि हातपंपांना पाणी टंचाईची झळ पोहचली आहे. यामुळे गावात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु आहे. जंगलव्याप्त भागात या गावांचे वास्तव्य असून जनावरांची मोठी संख्या गावकऱ्यांकडे आहे. नदीपात्रात पाणी नसल्याने पिण्याचे पाणी प्राप्त करण्यासाठी जनावरांची लाही लाही सुरु झाली आहे. पाण्यासाठी मध्यप्रदेशातील जनावरे सीमावर्ती गावात दाखल होत आहेत.याच नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणात पाण्याचा ठणठणाट आहे. धरण पूर्णत: कोरडा पडला आहे. या नदीवर महत्वाकांक्षी राजीव सागर प्रकल्प असून नदीपात्रात पाणी सोडण्याची ओरड गावात सुरु झाली आहे. नागरिकांना पिण्याची पाणी मिळत नाही. प्रकल्पात पाणी असताना नियोजन करण्यात येत नाही. नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणी मिळत नाही. यावरून प्रकल्पात असणाऱ्या पाण्याचा काय उपयोग असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. यामुळे परिसरात पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
सीमावर्ती गावात पाणीटंचाईची झळ
By admin | Updated: May 11, 2015 00:12 IST