मासळ : लाखांदूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा अंतर्गत आरोग्य उपकेंद्र जैतपूर येथे कायमस्वरुपी पाण्याचे कोणतेच साधन अजूनपर्यंत नसल्यामुळे रुग्णांना तसेच आरोग्य सेविकेला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या उपकेंद्रात आरोग्य सेविका सदनिका व प्रसूतिगृह आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ४५00 आहे. परंतु बिना पाण्याच्या सुविधेने गेल्या तीन वर्षापासून आरोग्य सेविका कर्तव्य बजावत आहे. त्यांना बाहेरून पिण्याचे पाणी मागवावे लागते. बालमृत्यू व मातामृत्यू टाळण्यासाठी शासनाने प्रत्येक उपकेंद्रात प्रसूतीकरिता प्रसूतिगृहाची निर्मिती केली. प्रसूतिगृहाच्या छतावर प्लास्टिकची पाण्याची टाकी लावलेली आहे. परंतु पाण्याचा स्त्रोतच नाही तर टाकीत पाणी येणार कुठून? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रात्री बेरात्री प्रसूतीकरिता रुग्ण येतात तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांना व आरोग्य सेविकेला पाण्यासाठी बराच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. उपकेंद्रात कोणतेच पाण्याचे स्त्रोत नसल्याने प्रसूतीकरिता व पिण्याकरिता पाणी उपलब्ध करणे आरोग्यसेविकेच्या नाकीनऊ आलेले आहेत. आरोग्यसेवा ही अत्यावश्यक व तातडीची सेवा असल्यामुळे पाण्यासारख्या महत्त्वाच्या समस्येमुळे परिणामकारक व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे आरोग्य सेविकेला अतिशय कठीण झाले आहे. आरोग्य केंद्रच पाण्याविना आजारी असेल तर जनतेला सेवा द्यायची, कशी असा प्रश्न आरोग्यसेविकेला भेडसावत आहे. वरिष्ठांना याबाबतीत माहिती असूनही कारवाई थंडबस्त्यात आहे. पाण्यामुळे घरकामात व कुटुंबीयांना सुद्धा त्रास होतो जर का पाणी समस्या अशीच राहत असेल तर भाड्याच्या घरात राहणे अधिक सोयीस्कर होईल, असे आरोग्यसेविकेला वाटत आहे. (वार्ताहर)
आरोग्य उपकेंद्रात पाण्याची समस्या
By admin | Updated: May 25, 2014 23:21 IST