करडी (पालोरा) : करडी हे जंगलव्याप्त परिसरात असून वन्यप्राण्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. वनविभाग तुमसर यांनी नुकसानीचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविला. मात्र, दीड वर्षानंतरही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने त्यांच्यात रोष पसरला आहे.करडी परिसराला निसर्गाचे वरदान लाभले असले तरी हेच निसर्गाचे वरदान शेतकऱ्यांसाठी शाप ठरु पाहत आहे. कोका जंगल टेकड्याचे संरक्षित अभयारण्यात रुपांतर करण्यात आले. न्यू नागझीरा व्याघ्र प्रकल्प व कोका वन्यजीव अभयारण्यामुळे जंगलात वन्यजीवांच्या प्रमाणात तृणभक्षक तसेच मांसाहारी प्राण्यांची संख्या वाढली आहे. सांबर, हरिण, चितळ, निलगाय, रानम्हशी यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याने अभयारण्याशेजारिल बफर झोनमध्ये त्याचा विपरित परिणाम जाणवत आहे. बफर झोनमधील शेत शिवारात वन्यप्राणयांचा उपद्रव वाढू लागला.जंगलापासून वैनगंगा नदीकाठापर्यंतची शेती उपद्रव्यामुळे धोक्यात आली आहे. मेहनतीने कसलेली शेती वन्यप्राण्यांच्या नुकसानीने मातीमोल होत आहे. शेतकऱ्यांनी या संबंधाने अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना अनेकदा माहिती दिली. मात्र सोलर फेन्सिंग किंवा अन्य प्रमारची सुविधा अजुनही पुरविण्यात आलेली नाही. पालोरा, केसलवाडा, खडकी, डांगरदेव, बोंडे, ढिवरवाडा, जांभोरा, लेंडेझरी, किसनपूर, पांजरा, बोरी, बोरगांव, कान्हळगांव येथील शेतकरी वन्यप्राण्यांच्या हौदोसाने त्रस्त आहेत. उपरोक्त गावातील प्रकरणे तुमसर वन विभाग, कोका अभयारण्य यांचेकडे यांचे नुकसान भरपाईसाठी पाठविण्यात आलेली आहेत. मात्र दीड वर्ष लोटला असतांना नुकसान भरपाईचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या हाती पडलेला नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होत असतांना विभागाकडून मदतीसाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतिक्षा
By admin | Updated: January 17, 2015 01:20 IST