एस. जे. भट्टाचार्य : कारागृहात गांधी विचार परीक्षा भंडारा : हिंसा, चोरी, लबाडी इत्यादी मार्गाने क्षणभर जीवनाचे प्रश्न सुटल्यासारखे वाटतात. परंतु ते सुटत नसतात. तो चुकीचा मार्ग ठरतो. सत्याचा मार्ग हाच खरा मार्ग आहे. गांधी चरित्रापासून हाच बोध आपण घेऊ शकतो. याच सत्याच्या मार्गाने मोहनदास महात्मा झाला, भंडाऱ्याचे अतिरिक्त न्याय दंडाधिकारी एस.जे. भट्टाचार्य यांनी समर्पक उदाहरणे देत, जिल्हा कारागृहात बंदीसोबत संवाद साधत होते. निमित्त होते, गांधी विचार मंच भंडारा, सर्वोदय मंडळ मुंबई आणि जिल्हा कारागृह भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीसाठी गांधी विचार परीक्षेचे. यावेळी उद्योजक रामविलास सारडा उपस्थित होते. या परीक्षेत आयोजित ६१ बंदीना त्यांच्या सहभागाबद्दल अतिरिक्त न्याय दंडाधिकारी एस.जे. भट्टाचार्य, रामविलास सारडा, कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, तुरुंग अधिकारी रमेश मेंगरे यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात आले. यावेळी भट्टाचार्य म्हणाले, बंधूनो कारागृहात येण्याची पुन: चूक करू नका. चांगली कामे करून समाजात मानाची जागा स्वत:करिता निर्माण करा. स्वत:ला कमी लेखू नका. नकारार्थी विचार सोडा, हिंसा, लबाडी, मारामारी हे सारे नकारार्थी विचारातून घडतात. चांगल्या लोकांचे अनुकरण करा त्यामुळे तुमचे आचार विचार बदलतील. तुमच्या कुटुंबावर त्यांचा सकारात्मक परिणाम होईल. परिवर्तनाचा प्रारंभ आतापासूनच करा. वेळ दवडू नका, असे आवाहन केले. संचालन गांधी विचार मंचचे अध्यक्ष प्रा.वामन तुरिले यांनी तर आभार प्रदर्शन कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)प्राविण्याचे मानकरी प्रथम परीक्षा (वर्ग ५ ते ७) प्रथम शिवशंकर नारायण शेंडे, द्वितीय एकनाथ योगीराज देशभ्रतार, द्वितीय परीक्षा (वर्ग ८ ते १०) प्रथम क्रमांक शिवशंकर रवाकचंद साखरवाडे, द्वितीय हेमकृष्ण गोंगलजी सिंदीमेश्राम, तृतीय परीक्षा (वर्ग ११ ते पदव्युत्तर) प्रथम भानूदास रामकृष्ण मुनेश्वर द्वितीय प्रल्हाद तानबाजी पवार यांचा क्रमांक लागला.याप्रसंगी गांधी चरित्र व विचारांवर, विचार मांडल्याबद्दल बंदी, जीवन, सोपान दास यांना बक्षिस देण्यात आले.
हिंसा वा लबाडीने प्रश्न सुटत नाही!
By admin | Updated: December 31, 2016 01:45 IST