भंडारा : निसर्गाचे संतुलन राखल्यास वातावरणातील प्रदूषण वाढणार नाही. त्यामुळे मनुष्य आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी वृक्षांच्या संवर्धनाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. सुमंत देशपांडे यांनी केले. निसर्ग, झाडे व फुलाप्रती आस्था व प्रेमभावना जागृत व्हावी म्हणून ग्रीनहेरीटेज पर्यावरण संस्थेच्या वतीने स्थानिक शितला माता मंदिर सभागृहात पुष्पगुच्छ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते विचार व्यक्त करीत होते. उद्घाटक म्हणून केशवराव निर्वाण तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राधाकिसान झंवर, ईश्वरलाल काबरा, अॅड. राकेश सक्सेना, नुतन मोघे, ग्रीनहेरीटेजचे संस्थापक मो. सईद शेख, सनफ्लॅगचे उपमहाव्यवस्थापक के.जी. बांते उपस्थित होते. पाहुण्यांचे वृक्षरोपटे देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक सईद शेख यांनी केले. निर्वाण यांनी उद्घाटन भाषणात भंडारावासीयांसाठी हे उपक्रम एक सुंदर पर्वणी अशा शब्दांत उपक्रमाची स्तूती करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. झँवर यांनी, दुखी जीवन सुखी करण्याकरिता ईश्वराने जसे आपल्याला जीवन जगण्याकरिता वायू, ऊन आणि जल प्रदान केले आहे. तसेच आपण ही निसर्गाकडे जावून आपले जीवन ही सार्थकी करण्याचे आवाहन केले. स्पर्धेत विविध जातीच्या रंगबेरंगी पुष्पांनी सजविलेले आकर्षक पुष्पगुच्छ व कुंड्या प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.इंदिरा काबरा, अरविंद गुप्ता, सुधाकर चकोले, डवले, संजय बोरकर उपस्थित होते. मंजुषा गायधनी यांनी संचालन तर आभार प्रदर्शन शेख यांनी केले. चंदा मुरकुटे, जयंत धनवलकर, विलास केजरकर, मोहन भाकरे, दिनेश मेश्राम, पद्माकर फडके, नीता मलेवार आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे संवर्धन गरजेचे
By admin | Updated: February 3, 2015 22:51 IST