एसटी महामंडळ : प्रवाशांमध्ये व्यक्त होतेय नाराजीलाखनी : आधीच कमी होत जाणाऱ्या प्रवाशांवर एसटी सुरक्षा अधिभाराचा भार टाकण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार १ एप्रिलपासून प्रतिप्रवासी एक रूपया दरवाढ करण्यात आली आहे. अपघातग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्यासाठी हा अधिभार लावण्यात आल्याने प्रवाशांमध्ये मात्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.एसटी अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना महामंडळातर्फे तीन लाख रूपये एवढी रक्कम नुकसान भरपाईपोटी दिली जाते. ही रक्कम वाढवून आता १० लाख रूपये करण्याचे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मागील वर्षी दिले होते. त्यानुसार या रकमेत तीन पट वाढ करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र आधीच तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाला हा भार झेपणारा नाही. त्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना नुकसान भरपाईपोटी देण्यात येणाऱ्या रकमेसाठी प्रवाशांच्या खिशात हात टाकण्यात आला आहे. त्यासाठी प्रतिप्रवासी निकष लावून हा सुरक्षा अधिभार लावण्यात आल्याचे सांगण्यात येते. नुकसानभरपाईची वाढीव रक्कम व भरपाईच्या दाव्यासाठी करावी लागणारी न्यायालयीन प्रक्रिया याचा खर्च यातून सहजच निघणार असल्याचे बोलल्या जाते. परंतु एसटीचे प्रवासी भारमान घसरत असताना अशाप्रकारे सुरक्षा अधिभाराच्या नावाखाली प्रवाशांना अधिकचा भुर्दंड दिल्याने एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अधिभारातून अपघात होवू नये, यासाठी काहीच उपाययोजना करण्यात येणार नाही. एसटीच्या चुकीमुुळे होणाऱ्या अपघातांचा भार प्रवाशांवर लादणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी प्रवाशांना बसतोय भुर्दंड
By admin | Updated: April 20, 2016 01:00 IST