भंडारा : वाहतूक नियंत्रण शाखा भंडारा यांच्याकडून स्थानिक लाल बहादूर शास्त्री विद्यालयात वाहतूक सुरक्षा, जीवन सुरक्षा कार्यक्रम घेण्यात आला. दि. १५ जानेवारी ते दि. १७ फेब्रुवारी दरम्यानचा कालावधी वाहतूक सुरक्षाविषयक जनजागृती करण्यास्तव शहरात व जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहतूक नियंत्रण विभागाकडून वाहतूक सुरक्षा अभियान राबविले जातेय. हेल्मेटचा वापर, दुचाकीवरून जाताना मोबाइलचा वापर न करणे, चारचाकी वाहनात सीटबेल्टचा वापर करणे, गाडी चालवताना मद्यप्राशन न करणे,शाळेत जाताना येताना, रस्ता ओलांडताना सिग्नल्सची भाषा समजून घेणे, सुरक्षित रस्ता ओलांडणे, सायकल वा दुचाकीवाहनावरून जाताना हातात हात घालून मैत्रीचे प्रदर्शन न करणे, जमावाने एकत्र येऊन वाहतुकीची कोंडी न करणे रस्त्यावर क्रिकेट अथवा पतंग न खेळणे अशा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या विविध बाबींवर वाहतूक नियंत्रण शाखा भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे यांनी मार्गदर्शन केले. मुलांच्या व शिक्षकांच्या दुचाकी व सायकलींना रिफ्लेक्टर्स लावून ते लावण्याचे प्रयोजन त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
याप्रसंगी वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी पो. ना. स्वप्नील गुल्हाने, पो.ना. कार्तिक कामथे हे उपस्थित होते. प्रारंभी शाळेच्या प्राचार्या केशर बोकडे यांनी सर्व अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने स्वागत केले. दहावीचा विद्यार्थी तन्मय नवलाखे यानेही त्याचे अनुभव कथन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गालफाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माध्यमिक विभाग प्रमुख शालिकराम ढवळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यास क्रीडाप्रमुख सुनील खिलोटे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास इयत्ता दहावी व सातवीचे विद्यार्थी उपस्थित होते. कोरोना संक्रमणाच्या काळाचे भान ठेवून सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमावली अनुसरून कार्यक्रम घेण्यात आला.