चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : शहरासह तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी धुमाकूळ घातला आहे. लाखनी शहरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्याचा वाहतुकीवर ताण येत असताना आता अवैध प्रवासी वाहतुकीनेही त्यात भर घातली आहे. वाहनांच्या गर्दीने नागरिकांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. यात सर्व प्रकाराचे पोलीस मात्र मुक दर्शक ठरत आहे.जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकदारांनी समांतर यंत्रणा सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मार्गावर आणि गावखेड्यापर्यंत अवैध प्रवासी वाहने पोहचत आहे. एसटी भाड्यापेक्षा कमी दरात वाहतूक होत असल्याने आपसुकच नागरिक त्याकडे आकषित होत आहेत. मात्र खुराड्यात कोंबड्या कोंबाव्या तसे प्रवाशांना भरून अवैध प्रवासी वाहतूक नित्याची बाब झाली आहे. काही मार्गावर तर पायदान प्रवास घडविला जातो. हा धोकादायक प्रवास जीव मुठीत घेवून सर्वत्र सुरू आहे.पोलिसांच्या हप्तेखोरीवृत्तीमुळे या वाहतुकीला चांगलेच खतपाणी मिळत आहे. अलिकडे लाखनी शहरात तर ही प्रवासी वाहतूक जीवघेणी ठरत आहे.लाखनी शहरात मुख्य बसस्थानक, बाजार चौक, जयस्तंभ चौक, समर्थनगर येथील तहसील कार्यालयासमोर काळी-पिवळी वाहने उभी असतात. एसटी बसच्या समोर आॅटो-रिक्षा धावत असतात. उभ्या आॅटो-रिक्षामुळे लोकांना त्रास होतो. राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य मार्गावर व सर्व्हिस रोडवर आॅटोरिक्षांचा धुमाकूळ सुरू असतो.बाजार चौकातील वर्दळीच्या ठिकाणी आॅटोरिक्षा उभे असतात. पार्किंगचे ठिकाण नसलेल्या जागेवर वाहन उभे करून प्रवाशांना ओरडून आकर्षित केले जाते. बस चालकांना बस थांबविण्यासाठी जागा नसते. थांब्याच्या पुढे बस उभी राहिली की प्रवाशांना ओझे घेवून बसच्या मागे अक्षर: धावावे लागते. तसहील कार्यालयासमोरच्या बसस्थानकात शाळकरी विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत असतात. त्यांच्या एका बाजूला आॅटोरिक्षा उभे असतात. गांधी विद्यालय ते तहसील कार्यालयपर्यंतचा रस्ता गजबजलेला असतो. त्यातच चारचाकी वाहनेही उभी असतात.शाळकरी मुलींना सर्वाधिक त्रास सोसावा लागतो. अनेकदा याठिकाणी मुलींना त्रास देण्याचे प्रकारही घडतात. परंतु मुली त्याकडे दुर्लक्ष करतात. एखाद्यावेळेस याच प्रकारातून अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यातील अवैध प्रवाशी वाहतुकीवर अंकुश आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेवून या वाहतुकदारावर कारवाई करण्याची मागणी लाखनी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.लाखनी पोलिसांची बघ्यांची भूमिकालाखनी शहरात अवैध वाहतुकदारांचा धुडगूस अहोरात्र सुरू असतो. त्याठिकाणी वाहतूक पोलिसही 'ड्युटी' करीत असतात. मात्र कोणत्याही वाहनधारकावर कारवाई केली जात नाही. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात. मात्र बाहेरगावचे वाहन आले की त्याच्यावर कारवाई करून वाहतुकीस अडथडा निर्माण केल्याचे कलम लावून चालकावर कारवाई केली जाते. अनेकदा मद्य प्राशनाचे कलमही लावले जाते. यासर्व प्रकारात पोलीस आणि अवैध प्रवासी वाहतुकदारांचे अर्थपूर्ण संबंध कारणीभूत असल्याचे बोलले जाते.
अवैध वाहतुकीचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:13 IST
शहरासह तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी धुमाकूळ घातला आहे. लाखनी शहरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्याचा वाहतुकीवर ताण येत असताना आता अवैध प्रवासी वाहतुकीनेही त्यात भर घातली आहे.
अवैध वाहतुकीचा धुमाकूळ
ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : जनता त्रस्त, सर्व्हिस रोडवर गर्दी, अपघाताची कायम भीती