शिवसेनाही लढतीत : भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीत असंतुष्ट वाढलेभंडारा / मोहाडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी हे तीन पक्ष गट, गणाच्या सर्वच जागेवर लढत आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे एकमेकांविरुद्ध तगडे आव्हान राहणार आहे. ही निवडणूक सत्ताधारी भाजपसाठी प्रतिष्ठेची तर विरोधातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची ठरणार आहे.मोहाडी तालुक्यातील वरठी गट व गण सोडून शिवसेना सर्व जागांवर लढत आहे. काँग्रेस, राकाँ व भाजपाने सर्वच जिल्हा परिषद क्षेत्राच्या सात जागेवर व पंचायत समितीच्या चौदा क्षेत्रात आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेने वरठी क्षेत्रातून गण व गटात एकही उमेदवार उभा केला नाही. तसेच मनसे व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केवळ खमारी बुज या पंचायत समिती क्षेत्रात आपला उमेदवार उभा केला आहे. या वेळच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सर्वच पक्ष स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे उमेदवारांना निवडूण येण्यासाठी फार मेहनत करावी लागणार आहे. भाजपा-सेना, काँग्रेस-राकाँ हे मित्र पक्ष यावेळी मतदान मागताना एकत्र दिसणार नाहीत. मोहाडी तालुक्यात मागील निवडणुकीत भाजपाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चार जागा जिंकल्या होत्या. पंचायत समितीच्या निवडणुकीत दहा जागा जिंकून एक हाती सत्ता काबीज केली होती. यावेळी भाजपाला पूर्वीचा आकडा कायम ठेवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची उमेदवारी देताना भाजपाने जुन्या कार्यकर्त्यांना बाजुला सारले आहे. नवीन कार्यकर्त्यांनाही काही प्रमाणात दूर सारले आहे. त्यामुळे भाजपात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. बंडखोरी रोखण्यासाठी भाजपाश्रेष्ठी प्रयत्नात आहेत. शेतकऱ्यांच्या धानाला भाजपा सरकारने भाव न दिल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकदिलाने काम केले आता तो भाग उरला नाही. मोहाडी तालुक्यातील कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण सुरू झाले आहे. कुणबी आहे म्हणून उमेदवारी देवू नका हा समीकरण लागू केल्याचे भाजपात दिसून येत आहे. कुणबी समाजाचे राम आस्वले, मधुकर कुकडे यांनी तीनदा भाजपात बाजी मारली. त्यांच्या कार्यकर्त्यांना तोडण्याचे काम सुरू आहे. मोहाडी तालुक्यात काँग्रेसची बाजू भक्कम नसली तरी गावागावात काँग्रेसची ओळख आहे. राष्ट्रवादी पक्ष जोमाने वाढत चालला आहे. आज स्थितीत भाजपाला तोड देणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या निवडणुकीत चारही पक्ष वेगवेगळे लढत असले तरी बऱ्याच ठिकाणी दुहेरी व तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठ्या जोमाने उतरली आहे. शिवसेनेचे उमेदवार भाजपाच्या उमेदवारांना पाडायला मदत करणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी दोन पक्ष हेही एकमेकांना पाडापाडीचे राजकारण करणार आहेत. मागील निवडणुकीसारखी ही निवडणूक कोणत्याही उमेदवारांना सोपी राहणार नाही. चार पक्ष एकमेकांशी भिडणार आहेत. या लढतीत जिंकण्यासाठी उमेदवारांजवळ फार कमी वेळ आहे. अनेक उमेदवार नवीन आहेत. मतदारांसमोर जाण्यासाठी पाण्या पावसात, चिखल तुडवत जो मतदारांजवळ उमेदवार जाईल, तो उमेदवार विजयाच्या जवळ जाणार आहे. (प्रतिनिधी/ तालुका प्रतिनिधी)
सर्वच पक्षात तगडे आव्हान
By admin | Updated: June 25, 2015 00:34 IST