गोंदिया : गावात सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, गावातील तंटे पोलिसात न जाता ते गावातच सामोपचाराने मिटावे, याकरिता गावोगावी तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र, या समित्यांचे कार्य पुरस्कारासाठीच शिल्लक असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत गावोगावी दारू, मोहफुले आणि देशीदारूची चोरट्या मार्गाने विक्री सुरू आहे. समितीतील सदस्यच स्वत: तंट्यात सहभागी होत असल्याने पोलिसांना त्यांनाच सांभाळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे व्यसनाधीनतेने डोके वर काढले आहे.दारू व इतर व्यसनाचा समाजमनावर मोठा परिणाम होतो. कुटुंब उद्धवस्त व्हायला लागले. याकरिता गावात सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे व तंटामुक्त मोहीम यशस्वी व्हावी, याकरिता सुरुवातीला दारूमुक्त समाजाची निर्मिती गरजेची आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी, पत्रकार, तलाठी, पोलीस, वीजमित्र आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांची या तंटामुक्त समितीवर नियुक्ती करण्यात आली.सलोखा राखण्यासाठी या समितीतील सर्व सदस्यांच्या बैठका घेण्यात आल्या. परंतु सरकारी कर्मचारीच या सभेला उपस्थित राहत नसल्याने तंटामुक्ती योजनेचा उद्देश भरकटत चालला आहे. केवळ पुरस्कारासाठी ही मोहीम राहत असल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे. व्यसमुक्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या समित्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे. (तालुका प्रतिनिधी)
तंटामुक्त समित्यांचा व्यसनमुक्तीला ठेंगा
By admin | Updated: June 23, 2014 23:44 IST