जिल्हाधिकारी धीरजकुमार : स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचे उद्घाटनभंडारा : विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हयाचे स्थान फारच मागे असून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी जागृती होणे गरजेचे आहे. सामाजिक न्याय भवनामध्ये नव्याने स्थापित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा अभ्यास केंद्रामध्ये विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त दर्जाच्या पुस्तकाचे वाचन करुन आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्म दिवसानिमित्त सामाजिक न्याय दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्राचा उदघाटन सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अॅड. रामचंद्र अवसरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नीरज बनसोड, जिल्हा कोषागार अधिकारी अमीत बनसोड, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण देवसूदन धारगावे उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात अॅड.अवसरे म्हणाले, शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देवून लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी निरज बनसोड यांनी यु.पी.एस.सी व एम.पी.एस.सी. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी याबाबत मार्गदर्शन केले.देवसूदन धारगावे यांनी प्रास्ताविकातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाजाप्रती दिलेले योगदान, त्यांच्या कायार्ची महती विषद केली. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ व्या वर्षात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी समाज कल्याण विभागास विविध उपक्रम राबवून जे योगदान दिले त्याबद्दल समाज कल्याण विभागाचे वतीने आमदार अवसरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच शासकीय वसतिगृहातील, निवासी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थांचा, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना मिनी ट्रक्टर योजनेतील लाभार्थ्यांचा, रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा, स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राकरीता अल्प कालावधीत फार सुंदर मांडणी करुन अभ्यास केंद्र सुरु करण्यास दिलेल्या योगदानाबद्दल लता शहारे व अजय बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात तालुकास्तरीय महाविद्यालयात वक्तृत्व व प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करुन विविध उपक्रम राबविल्याबद्दल प्रमोद गणवीर यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त शाहीर ब्रम्हदास हुमणे यांनी पोवाडा सादर केला तर बार्टीच्या समता दुतांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन रंजना गजाम यांनी केले तर आभार बार्टीचे प्रकल्प सचालक गोडबोले यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील समाजभूषण पुरस्कृत व्यक्ती, संस्थांचे पदाधिकारी, विभाग प्रमुख, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी जागृती होणे गरजेचे
By admin | Updated: June 29, 2016 00:39 IST