करडी पालोरा : दोन वर्षापूर्वी बोरगाव पालोरा मार्गावरील बंधार्याला छिद्र पडले असून संपूर्ण बंधारा पावसाळ्यात वाहून जाण्याची सचित्र शक्यता अनेकदा लोकमतने व्यक्त केली होती. मात्र कृषी विभाग मोहाडी यांनी दुर्लक्ष केल्याने बंधारा आज पूर्णत: वाहून गेला आहे. तशीच स्थिती पांजरा (बोरी) नाल्यावरील कृषी दगडी बंधार्याची झाली आहे. प्रल्हाद लांडगे व वामन कुकडे यांच्या शेतांना जोडणार्या दगडी बंधार्याला छिद्र पडले आहेत. वेळीच दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात बंधारा वाहून जाण्याची शक्यता शंभर टक्के आहे. पांजरा व पालोरा गावाच्या सीमेवरून वाहणार्या नाल्यावर मोहाडी कृषी विभागामार्फत अनेक बंधारे बांधले गेले. मात्र त्यातील बहुतेक बंधार्याची दुरवस्था झाली आहे. काही वेळीच लक्ष न दिल्याने वाहून गेलीत तर काहींना छिद्र पडली आहेत. बंधार्यांच्या पोटात मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे बंधार्याची पाणी साठवण करण्याची क्षमता अगदीच बेताची झाली आहे. पांजरा पालोरा सीमेवर नाल्यात बांधलेला बंधारा आज अंतिम घटका मोजत आहे. त्याला औषधोपचाराची गरज आहे. पांजरा येथील प्रल्हाद लांडगे व पालोरा येथील वामन कुकडे यांच्या शेताला जोडणार्या बंधार्याला अनेक ठिकाणी छिद्र पडली आहेत. पावसाळ्यातील पुराचे पाण्यामुळे छिद्रे मोठी होऊन संपूर्ण बंधाराच वाहून जाण्याची भिती व्यक्त होत आहे. बंधार्याच्या दुरुस्तीची मागणी पांजरा बंधार्यामुळे परिसरातील अनेक शेतकर्यांना फायदा होतो. दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडून त्वरीत ठराव दिले जातील. कृषी विभागाने विशेष लक्ष देऊन निधी मिळवावा अशी मागणी पांजरा ग्रा.पं. चे सपरंच भगवान चांदेवार, वामन शेंडे, रामचंद्र शेंडे, गौरीशंकर राऊत, सचिन बडगे, धनपाल माटे, ग्रा.पं. सदस्या चंद्रकला भोयर, जयदेव राऊत यांनी केली आहे. (वार्ताहर)
दगडी बंधार्याला पडले भगदाड
By admin | Updated: May 27, 2014 00:36 IST