लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऑक्टोबर महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला होता. मात्र, सामान्य जनतेची फरफट होऊ नये, यासाठी महामंडळाने निवृत्त वाहक, कंत्राटी चालकांची भरती करून, एसटीची सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता न्यायालयाच्या आदेशानंतर हळूहळू एसटी कर्मचारी कामावर रुजू होत असले, तरी सर्वच एसटी कर्मचारी अद्याप कामावर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे चालकांची कंत्राटी भरती करण्यात आली होती. कंत्राटी चालकांसोबतच आता वाहकांचा प्रश्न सोडविण्यासाठी निवृत्त वाहकांच्या हाती एसटीची घंटा हाती देण्यात येणार आहे. अनेक एसटी कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लावून होते. मात्र, आता न्यायालयानेही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी बरोबर असली, तरी सध्या संप बंद करून, राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
जिल्ह्यात १०० कंत्राटी चालक जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी एसटीची सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी एका खासगी कंपनीमार्फत शंभर कंत्राटी चालकांची नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर, अनेक कंत्राटी कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यानंतर, पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन करण्यात आले होते. ३१ मार्च ही अखेरची मुदत देण्यात आली होती.
एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करु नकागत काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा तिढा आता अखेर सुटला आहे. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. मात्र याचवेळी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, असेही सांगितले आहे. यासोबतच निवृत्ती वेतन, अंशदान पीएफच्या दृष्टीनेही विचार करावा, असे न्यायालयाने सूचविले आहे.
अखेर संपाचा तिढा सुटलाएसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला असून एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यावर कारवाई करु नका, असे आदेशही कोर्टाने सरकारला दिले आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन द्यावे.
निवृत्त कंत्राटी वाहक घेणार सध्या भंडारा विभागात रुजू झालेल्या चालकांची संख्या जास्त असली, तरी वाहकाची संख्या कमी आहे. त्यामुळे एसटी बससंख्या वाढविण्यासाठी कंत्राटी निवृत्त वाहकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
४७५ जण कामावरभंडारा विभागात भंडारा-गोंदिया, पवनी, तुमसर, साकोली, तिरोडा आगारातील १,४३७ एसटी कर्मचाऱ्यांपैकी ४७५ जण कामावर परतले आहेत. एकूण ३३ टक्के कर्मचाऱ्यांची कामावर उपस्थिती आहे.