आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांना तारणहार ठरलेले आहे. शासनाच्या आधारभूत केंद्रावर शेतकरी हक्काने धान विक्री करतो. यावर शासनाच्यावतीने मूळ किमती व्यतिरिक्त प्रोत्साहन राशी अर्थात बोनस सुद्धा मिळते. शेतकरी आपला धान आधारभूत केंद्रावर विकून मोकळा होतो. परंतु आधारभूत केंद्राने खरेदी केलेला धान पुढे भरडाईसाठी उचल होत नसल्याने धान संकटात सापडलेले आहेत. अवकाळी पावसाच्या दणक्यात धानाला सडका वास सुद्धा येत आहे. गोदाम उपलब्धता अत्यल्प असल्याने व शेतकऱ्यांचे धान मोजणे अत्यावश्यक झाल्याने खुल्या जागेत धान मोजल्याशिवाय पर्याय नव्हता. लोकप्रतिनिधींनी सुद्धा मोजणीकरिता प्रोत्साहित केले. मात्र आता धानाची उचल होत नसल्याने मध्यस्थाची भूमिका लोकप्रतिनिधींनी निभवावी अशी अपेक्षा आधारभूत धान खरेदी केंद्राकडून व्यक्त होत आहे.
बॉक्स
उताऱ्याची समस्या कायम
धान भरडाई झाल्यानंतर मिलर्सनी शासनाला ६७ टक्के एवढे तांदूळ देणे आवश्यक आहे. परंतु हंगामाचा अभ्यास केला असता केवळ ६० टक्के एवढाच उतारा निघालेला आहे. त्यामुळे ७ टक्क्याची उताऱ्याची समस्या कायम आहे. या समस्याकरिता लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, मंत्रालयातील सचिव यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यासह आधारभूत खरेदी केंद्रांना न्याय द्यावा. खरेदी केलेला धान १ मे पूर्वी न उचलल्यास उन्हाळी धानाचा हंगाम प्रभावित होण्याची दाट शक्यता उभी झालेली आहे.
मुरमाडी तुपकर येथील आधारभूत केंद्राच्यावर ४५ हजार क्विंटल धानाची खरेदी आटोपली आहे. यातून भरडाईकरिता केवळ २२०० कट्ट्यांची उचल झालेली आहे. उर्वरित सर्व धान केंद्रात पडून आहे. धान झाकण्यासाठी ७५ हजारांची ताडपत्री खरेदी करण्यात आली. जिल्हा पणन कार्यालयाने आधारभूत खरेदी केंद्राच्या समस्यांची जाणीव ठेवून तात्काळ भरडा याचा प्रश्न निकाली काढावा.
मधुकर झंझाळ,
संचालक दि भगीरथ भात गिरणी मुरमाडी/ तुपकर