लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सेतू अभ्यासक्रमातील अडचणी दूर करा किंवा विद्यार्थ्यांना शाळेत बोलण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कोरोनाने २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रात नियमित शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे गत सत्रात विद्यार्थ्यांना आवश्यक अपेक्षित क्षमता संपादित न करता सर्व विद्यार्थी पुढील वर्गात प्रविष्ट झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी अपेक्षित क्षमता संपादित केले असे गृहीत धरून एससीईआरटी स्तरावरून सर्व विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम तयार केलेला आहे. सेतू अभ्यासक्रम राबवित असताना हस्तपुस्तिका उपलब्ध झालेल्या नाहीत. हा अभ्यासक्रम ऑनलाईन राबवावा की ऑनलाईन हेच स्पष्ट होत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन पोहोचणे शक्य नाही. ग्रामीण भागातील पालकांचे अँड्रॉइड मोबाईल असले तरी ते त्यांच्या स्वतः जवळ असतात बरेच वेळा ते बाहेर असतात किंवा कुटुंबामध्ये एकपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास त्यांची अडचण निर्माण होते. बऱ्याच ग्रामीण भागातील पालकांजवळ साधे मोबाईल आहेत. सेतू अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर ४५ दिवसांच्या कालावधीत आठ दिवस हा सुट्टीचा कालावधी आहे ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असताना ४५ दिवसात अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार. तसेच जो पालक अशिक्षित आहे किंवा कामासाठी संपूर्ण दिवसभर घराबाहेर असतो अशा पालकांना व त्यांच्या पाल्यांना अभ्यासक्रम कसा व कोणत्या पद्धतीने देता येईल, असा प्रश्न निवेदनात नमूद आहे. गृहभेटीतून प्रत्येक पालक व विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यात अनेक अडचणी येतात. शालेय वातावरणाच्या बाहेर असल्यामुळे विद्यार्थी शिक्षकांना सहकार्य करत नाहीत. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, सुधीर वाघमारे, संजीव बावनकर, मुकेश मेश्राम, राजू सिंगनजुडे, दिलीप बावनकर, राजेश सूर्यवंशी, रमेश कटेखाये, राधेश्याम आमकर, विनायक मोथारकर, भास्कर खेडीकर, मेश्राम, दिलीप गभने, रजनी करंजेकर, रमेश लोणारे, सेवकराम हटवार, नरेश देशमुख, राजन सव्वालाखे, शंकर नखाते, भैयालाल देशमुख, अनिल गयगये, राकेश चिचामे, दिनेश घोडीचोर, नामदेव गभने, योगेश कुटे, यामिनी गिऱ्हेपुंजे, संध्या गिऱ्हेपुंजे, शीलकुमार वैद्य, प्रकाश चाचेरे, सुरेंद्र उके, कैलास बुद्धे, देवानंद दुबे, महेश गावंडे, चेतन बोरकर, विवेक हजारे, हितेश उईके, सुधीर माकडे आदींचा समावेश होता.
कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करा - एससीईआरटीद्वारे दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर अभ्यासक्रम राबविताना प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणीचा विचार कुठेही करण्यात आलेला नाही. त्या अडचणींवर उत्तर वरिष्ठांकडे किंवा प्रशासनाकडे नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीत हा विषय मांडून एक ते आठच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के किंवा गटागटाने पालकांच्या परवानगीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन व उपाययोजनांचे पालन करून शाळेत बोलविण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी आहे.