बंदोबस्ताची गरज : वनविभागाचे दुर्लक्ष भंडारा : तालुक्यातील खुटसावरी परिसरात बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास शेतशिवारामध्ये शेंडे नामक महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगवधाने त्या महिलेने बिबट्यापासून सुटका केली. जंगलातील तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी झाल्याने आता वनातील हिंस्त्र प्राण्यांचा मोर्चा गावाकडे वळत चालला आहे. त्यामुळे वनातील हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार करीत आहेत. यावर्षी निसर्गाचे पर्जन्यमान कमी झाल्याने जंगलातील पाणवठ्यात व नदीनाल्यातही पाणी शिल्लक नाही. पाण्याच्या शोधात जंगलातील वन्य प्राणी गावाशेजारी धाव घेत आहेत. दिवसेंदिवस बिबट व वाघाची या परिसरात दहशत वाढली आहे. शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. आता रबीचा हंगाम सुरु असल्याने गहू, भाजीपाला या पिकाला पाणी देणे गरजेचे आहे. परंतु खुटसावरी परिसरात बिबट्याचा संचार सुरु झाल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे. याकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. (नगर प्रतिनिधी)
खुटसावरी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By admin | Updated: December 29, 2016 02:02 IST