राज्यातील पहिला उपक्रम : शीतगृहाचीही सुविधा भंडारा : शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित पिकांना योग्य दर मिळावा, व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या सहकार व पणन मंत्रालयाने सावता माळी भाजी बाजार प्रकल्प सुरू करण्याची योजना अंमलात आणली आहे. या प्रकल्पातंर्गत भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे बाजार समितीच्या पाच एकर विस्तीर्ण जागेवर हा सुरू होणार असून हा प्रकल्प राज्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पासाठी मोहाडी व तुमसर तालुक्यातील २४६ गावांचा समावेश राहणार आहे. त्यासाठी या गावांची अद्ययावत माहिती गोळा करण्याच्या सूचना जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. हा प्रकल्प विकसीत करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, त्यासाठी आमदार चरण वाघमारे आणि पणन विभागाचे सरव्यवस्थापक मिलींद आकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारला बैठक झाली. या बैठकीत बाजार समितीचे संचालक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पणन अधिकारी, कृषी तज्ज्ञ व कृषी अधिकारी, कृषीभूषण व प्रगतशील शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी) १०० शेतकऱ्यांची कंपनी होणार भाजीपाला हे पीक नाशिवंत असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना उत्पादित केलेले पीक कमी दराने विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी मोहाडी येथील शीतगृहात सहा महिन्यापर्यंत भाजीपाला मोफत ठेवता आला पाहिजे. पिकांना बाजारात योग्य दर आल्यानंतर पीक विकता यावे, यासाठी शीतगृह तयार करण्यात आले आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांचे पीक आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करता यावी, यासाठी जिल्ह्यातील १०० शेतकऱ्यांची कंपनी नोंदणीकृत करण्यात येणार असल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मोहाडीत होणार सावता माळी भाजी बाजार प्रकल्प
By admin | Updated: April 23, 2017 00:37 IST