मुख्य आरोपींना तात्पुरता जामीन : प्रकरण लाखनी येथील अक्षय पतसंस्थेचे प्रशांत देसाई भंडारा लाखनी येथील अक्षय नागरी पतसंस्थेतील लाखो रूपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या चार संचालकांना यापूर्वीच तात्पुरता जामीन मिळाला असून उर्वरित तिघांना शुक्रवारला तात्पुरता जामीन मिळाला आहे. या संचालकांना जामीन मिळाल्यामुळे आतापर्यंत या प्रकरणाची पाळेमुळे शोधणाऱ्या तपास करणाऱ्या लाखनी पोलिसांची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अक्षय पतसंस्थेत ३३ लाख ९९ हजार ३७० रूपयांचा घोटाळा झाल्याचे लेखापरिक्षणात स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा लेखापरिक्षक श्रीकांत सुपे यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्षांसह आठ जणांविरूद्ध गुन्हा नोंदविला. अपहार प्रकरणातील पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तमराव वरकड, उमराव बावणकुडे, देवाजी पडोळे, देवराम चाचेरे, व्यवस्थापक सूर्यभान गायधने, अभिकर्ता घनश्याम निंबेकर, अभिकर्ता संजय कुंभरे व संगणक आॅपरेटर प्रशांत पाठक या आठजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. जीवने यांच्या न्यायालयात उत्तमराव वरकड, उमराव बावनकुळे, देवाजी पडोळे, देवराम चाचेरे यांना यापूर्वीच तात्पुरता जामीन मिळाला होता. व्यवस्थापन सूर्यभान गायधने, धनश्याम निबेंकर, संजय कुंभरे यांना शुक्रवारला तात्पूरता जामीन मिळाला आहे. तर प्रशांत पाठक हा अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा तपास लाखनीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे करीत आहे. यातील सर्व आरोपी हे लाखनी येथील असूनही लाखनी पोलिसांनी जामीन मिळेपर्यंत कोणालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले नव्हते. याबाबत संपर्क साधला असता तपास सुरू असून आरोपी फरार असल्याचे पोलीस सांगत होते. अपहारप्रकरणी ज्यांना अटक करणे गरजेचे होते, त्या सर्वांना पोलिसांनी अभय दिल्याचे यावरून दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता लाखनी पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. ठाणेदारांची भूमिका संशयास्पद लाखनीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे हे स्वत: तपासी अधिकारी आहे. त्यांनी या आरोपींना जामीन मिळू नये यासाठी न्यायालयात बाजू मांडण्याची गरज होती. मात्र, ते स्वत: न्यायालयात हजर न राहता अधिनस्थ कर्मचाऱ्यांना प्रकरणाच्या कागदपत्रांसह पाठविले होते. पहिल्या सुनावनीच्यावेळी पोलीस व सरकारी वकील यांच्यात सामंजस्य जुळून आले नाही. त्यामुळे सरकारी वकीलांनी कागदपत्रांचे वाचन न झाल्याने पुढील तारीख देण्याची विनंती केली होती. त्यामुळे दुसऱ्याच सुनावनीत पतसंस्थेच्या चार संचालकांना तात्पूरता जामीन मिळाला. तसाच प्रकार दुसऱ्या जामीन अर्जावर सुनावणीच्या वेळेस झाल्याची चर्चा आहे. ठाणेदार म्हणतात मिटिंगमध्ये आहे लाखनी पोलिसांच्या भूमिकेमुळे या गंभीर प्रकरणाच्या तपासाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. दोषी कोठडीत जाण्याऐवजी खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांनी यात काय भूमिका घेतली याबाबत विचारणा करण्याकरिता त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी पहिल्यांदा प्रतिसाद दिला नाही, दुसऱ्या वेळेस मिटींगमध्ये असल्याचे सांगून भ्रमणध्वनी बंद केला. दरम्यान शुक्रवारलाही त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता.
लाखनी पोलिसांची भूमिका संशयास्पद
By admin | Updated: April 23, 2017 00:43 IST