करडी (पालोरा) : ग्राम प्रशासनाच्या निर्णय क्षमतेतून इच्छाशक्तीतून चांगले फलित कसे पाहावयास मिळतात, त्यातून गावाचा विकास व मजुरांना रोजगार कसा दिला जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून मोहाडी तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीकडे पाहिले जात आहे. सदर ग्रामपंचायतीने रोहयो योजनेतून तलावातील गाळ काढला, शेतावर टाकला, सोबतच शाळेचा मैदान तयार केला. सौंदर्यीकरणासाठी जागा तयार केली. त्यातूनच गावातील ३५० मजुरांना रोजगार मिळाला. महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना गावासाठी वरदान ठरली आहे. या योजनेमुळे मागेल त्याला काम व कामानुसार दाम दिले जाते. कामाची १०० टक्के हमी मिळत असल्याने मजुरांचे पलायन तर थांबेलच शिवाय गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. या योजनेचे स्वरुप व कामे बदलत्या काळानुरुप बदलले आहे. अनेक विकास कामांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. मात्र अजूनही लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे गावे विकासापासून वंचित आहेत. कमिशन मिळणारी कामे करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. त्यासाठी झगडे करण्यासही त्यांना काही एक वाटत नाही. मोहाडी तालुक्यातील मुंढरी परिसराचा विकाससुद्धा अशाच उपद््व्यापामुळे खुंटला. मात्र ग्राम प्रशासन जागृत असल्यास गावाचा विकास व लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणात दिला जाऊ शकतो. या दृष्टीने आज खडकी ग्रामप्रशासनाकडे पाहिले जात आहे. सन २०१४ वर्षात खडकी ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेंतर्गत तलावातील गाळ काढण्याचे काम नुकतेच हाती घेतले. कामावर ३५० मजुरांनी उपस्थिती दर्शविली. कामे जोमाने सुरू आहेत. तलावातून काढलेला सेंद्रिय खताचा गाळ शेतकर्यांच्या शेतात त्यांच्या मागणीनुसार घातला गेला. त्यानंतर जि.प. पूर्व माध्यमिक शाळेच्या मैदानाच्या विकासाचा आराखडा आखला गेला. शाळेसमोरचा, रस्त्याला लागून खोलगट भाग होता. नेहमी पुराचे पाणी त्यात साचायचे. शाळेमागूून नाला वाहत असल्याने मुलांसाठी पालकांच्या मनात भीती असायची. सरपंच असुराज वरकडे, उपसरपंच शर्मा बोंदरे, ग्रामसेवक अश्विन डोहळे, ग्रामरोजगार सेवक श्रीकृष्ण वरकडे यांनी सर्वप्रथम गाळ टाकून मैदान सपाटीकरणाचे काम हाती घेतले. ट्रॅक्टरच्या माध्यमातून माती घालून मैदानाचे सपाटीकरण केले गेले. शाळेच्या मागून नाल्याला पाळ घातली गेली. त्यामुळे पुराचे पाणी शाळेत येण्याचा मार्ग बंद झाला आहे. तयार झालेल्या मैदानाचा उपयोग सौंदर्यीकरणासाठी करण्याचा ग्रामप्रशासनाचा मानस आहे. मैदानाच्या सपाटीकणरणासाठी लोकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे निधीची मागणी केली. मात्र प्रत्येकवेळी लोकांच्या इच्छेकडे दुर्लक्ष केल्या गेले. रोहयो कामातून लोकांना काम व पैसा तर मिळालाच शिवाय गावाच्या हिताचा प्रश्नसुुद्धा मार्गी लागल्याचे समाधान नागरिकांत पहावयास मिळत आहे. यासाठी तांत्रिक पॅनल अधिकारी महेश निमजे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप वाढवे, बोधानंद बागडे, योगेश्वर वरकडे, शामलाल कातोरे, बायाबाई वरकडे, कमलाबाई सूर्यवंशी, सरिता घरडे, यांचीसुद्धा मोलाची साथ लाभली. रोहयो अंतर्गत मजुरांना कामे कमी पडू नयेत म्हणून नाला सरळीकरणाचे कामेसुद्धा हाती घेतले गेले. त्यावर ४२५ मजुरांना काम मिळाला. कामाचे भूमिपूजन कृषी तांत्रिक पॅनल अधिकारी अनिल ठवकर यांचे हस्ते झाले. (वार्ताहर)
रोहयोतून मैदानाचा विकास
By admin | Updated: May 18, 2014 23:23 IST