राजू बांते मोहाडीअनेक जीवांना शांत करणाऱ्या सुरनदीचा प्रवाह कधीच बंद पडला होता. पूर्णत: कोरडी पडलेल्या सूर नदीतून दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाच्या पाण्याने दुथळी भरून वाहत असल्याने कोरडीठाक पडलेली नदी आता तृप्त झाल्याचे दिसून येत आहे. नद्यांना जीवनदायी म्हटलं जाते. पूर्व दिशेला वाहणारी सुरनदी अनेक गावातील नागरिकांना आपल्या पात्रातील पाण्याचा थेंब नी थेंब देवून तृत करते. पण, अलीकडे प्रकल्प, धरण बांधली गेली आहेत. त्यामुळे अनेक नद्या पावसाळ्याच्या काही दिवसानंतर आटायला लागतात. या नद्यांमध्ये मोहगाव देवीजवळून वाहणाऱ्या सुरनदीचा समावेश आहे. साधारणत: सुरनदीचा प्रवाह डिसेंबर नंतर कमी व्हायला लागतो. जो प्रवाह दिसतो तो नैसर्गीक नसतो. बावनथडीचे पाणी धान शेतीला सोडण्यात येते. त्यातील धान शेतीमधील पाणी सुरनदी, गायमुख नदीला आपसुकच जाते. त्यामुळे जीवनदायी सुरनदी साधारणत: डिसेंबर-जानेवारीपर्यंत वाहताना दिसते. मार्च ते जून या चार महिन्यात सुरनदी तप्त होते. प्रवाह पूर्णत: बंद पडतो. त्यामुळे मोहगाव देवी व मोहाडी गावाला होणारा पाणीपुरवठा व्यवस्थीत होत नाही. मोहाडी नगरातील जनतेला पाण्यासाठी हातपंपावर जावे लागते. पिण्याचे पाणी दोन दिवसाआड मिळत असते. मोहाडीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळाभर मोठा संघर्ष करावा लागतो. तप्त झालेली सुरनदी व मोहाडीतील नागरिक पाऊस कधी येते याची चातकासारखी वाट बघतात. आता पावसाच्या प्रारंभीची मृग व आर्द्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. या पावसाने सुरनदीचा बंद पडलेला प्रवाह सुरू झाला आहे. पाण्याने सुरनदीच्या दोन थड्या एक झाल्या आहेत. उन्हाळाभर पावसाच्या थेंबाची प्रतिक्षा करणाऱ्या सुरनदीत पाणीच पाणी आल्याने तप्त झालेली ही नदी पूर्णत: तृप्त झाली आहे. मोहगाव देवी तसेच मोहाडीकरांना आता मुबलक पिण्याचे पाणी मिळू लागेल, अशी अपेक्षा आहे.
आसुसलेली सूर नदी झाली तृप्त
By admin | Updated: June 24, 2015 01:04 IST