भंडारा : आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्व आहे. पवनी तालुक्यातील बाम्हणी येथीेल शामराव मेंगरे यांनी चौरास भागात प्रथम हळदीचे विक्रमी उत्पादन घेऊन शेतकरी व बेरोजगार पुरुष व महिलांना रोजगाराची संधी दिली. सहा एकर शेतात ते मागील ३४ वर्षापासून हळदीचे उत्पन्न घेत आहेत. महाराष्ट्रात हा पहिला प्रयोग असल्याने जिल्हय़ात त्यांचे नावलौकिक ही झाले. हळदीच्या पाचोळ्य़ापासून सेंद्रीय खत तयार करुन, उर्वरित पाचोळा फेकण्यात येतो. त्याला जनावरेही खात नाही. या पाचोळ्याला आग लावून नष्ट करावे लागते. सन २00५ पासून त्यांनी प्रयोगाला सुरुवात केली. त्यात त्यांना यश आले. हळदीपासून सुगधीत तेल बनविले. एक हजार पाचोळ्यातून १00 लिटर तेल काढले. ज्याला कसलीही विजेची ही गरज नसते. केवळ इंधन लागते. तेल काढल्यानंतर त्याचा गांडूळ खत तयार केले जाते. या तेलाचा उपयोग वातनाशक, चर्मरोग यासारख्या आजारावर होतो. या तेलाला हैदराबाद, कोचीन येथे मागणी आहे. या तेलाला १,२00 रुपये प्रति लिटर केरळ लिटर प्रमाणे मागणी आहे. दिल्ली, पुणे, मुंबई येथे या तेलाला मागणी आहे. सन २00९ मध्ये बाम्हणी येथे विदर्भस्तरीय शेतकरी संमेलनाचे आयोजन करुन स्पाईसेस बोर्ड मुंबई यांनी हळदीला योग्य भाव मिळवून दिला आहे. विदेशामध्ये हळद व मिर्ची पाठविण्याकरीता जास्तीत जास्त हळदी पाहिजे अशी मुंबई येथील हळद व्यापार्यांनी भिवापूर येथे १0 मार्च २0१0 च्या संमेलनात मागणी केली होती. वाळलेली हळदीचे उत्पन्न एकरी ८ ते१0 क्विंटल होत असून त्यासोबतच आंतरिक पीक म्हणून तूर, सुर्यफूल, कांदे, भाजीपाला,पालेभाज्या, तिळाचे उत्पन्न एकरी ४ ते ६ क्विंटल होते. एक एकरामध्ये हळदीचे उत्पन्न १ लाख ३0 हजारांचे होऊन खर्च ३0 हजार होतो. मेंगरे यांनी शेतकर्यांना वायगाव हळदचे उत्पन्न घेण्याचे आवाहन केले. त्यांनी कृषी क्षेत्रात नवेनवे प्रयोग करीत आहेत. लहान बायलर युनिटची नवीन मशीन अत्यंत कमी खर्चात बसविली असून इंधन व मजुरीची बचत होऊन ८ दिवसांचे काम एका दिवसात होत आहे. गावातील २५ लोकांना रोजगार मिळत आहे. हळद, मिरची, धने आदी उत्पादने विकले जात आहेत. शासकीय नाबार्ड बँकेतर्फे सोलापूर, सातारा, रायपूर, नागपूर, भिवापूर, गोंदिया येथे कृषी विभागाच्या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. मुंबई येथे आयोजित कृषी विज्ञान प्रदर्शनीत शामराव मेंगरे यांनी हळदीपासून सुगंधी तेल निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवून या उपक्रमाला प्रथम पारितोषिक ही मिळाले. सरपंच, उपसरपंच पदावर असताना मेंगरे यांनी गाव परिसरात जल पुनर्भरण, जल स्वराज्य प्रकल्प सुरू करुन सुजलाम सुफलाम बनविण्यास मदत केली. मेंगरे यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी पुरस्कार, गौरव, सन्मान मिळाला. चौरास भागात कृषी पर्यटन व हळद उद्योगाला मोठय़ा स्वरुपात वाव असल्याचे शामराव मेंगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
हळदीच्या उत्पादनातून घडविली क्रांती
By admin | Updated: May 27, 2014 23:31 IST