भाग्यश्री गिलोरकर यांचे आवाहन : त्वचा व कुष्ठरोग शोधमोहिमेला जिल्ह्यात प्रारंभभंडारा : प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत कुष्ठरोग शोध अभियान कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाकरिता येणाऱ्या चमूला सर्वतोपरी सहकार्य करा. आजच्या स्थितीत जास्तीत जास्त कुष्ठरुग्ण शोधून काढल्यास पुढील काही वर्षात कुष्ठरुग्णांच्या संख्येत घट होवून जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्याचा संकल्प साकार करणे सोयीचे होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर यांनी केले.लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय येथे नुकतेच त्वचारोग व कुष्ठरोग अभियान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटन भाषणात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके होते.प्रमुख अतिथ्२ाी म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रवी कापगते, प्राचार्य डी.व्ही. देशमुख, आरोग्य सेवा कुष्ठरोगाच्या सहाय्यक संचालक मनिषा साकोडे, एन.जी. गायधने, चंद्रशेखर भिवगडे, डी.आर. पढार, एस.आर. धोंगडे आदी उपस्थित होते.भाग्यश्री गिलोरकर म्हणाल्या, १४ दिवसांच्या मोहिम कालावधीत आरोग्य यंत्रणेद्वारे १ हजार ११७ चमू जिल्ह्यात नेमण्यात आल्या असून २ लाख ६९ हजार ३६९ घराची तपासणीचे उद्दिष्ट साध्य करण्याचा मानस आहे. सर्वेक्षणावर तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरून वेळोवेळी पर्यवेक्षण टीमद्वारे सुक्ष्म पर्यवेक्षण करण्यात येणार आहे. संशयीत कुष्ठरुग्णांना जवळच्या आरोग्य संस्थेत कुष्ठरोगाचे निदान, औषधोपचार व आरोग्य शिक्षण विनामुल्य देण्यात येणार आहे. या मोहिमेचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.सुधीर वाळके यांनी शासकीय यंत्रणेवर दोष देण्याऐवजी समाजातील सर्व घटकांकडून सहकार्य मिळाल्यास निश्चितच कुष्ठरुग्ण संख्येत घट होईल. शिक्षण विभागातील मुख्याध्यापकांनी जिल्ह्यातील सर्व शाळेत विद्यार्थ्यांना सर्व रोगाचे आरोग्य शिक्षण दिल्यास आरोग्य शिक्षणाचे ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत होईल व रोगाला बळी पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येत निश्चित घट होईल, असे सांगितले.डॉ.कापगते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, कुष्ठरोगाचे जंतू निरोगी माणसाच्या शरीरात सहा महिने ते तीन वर्षापर्यंत सरासरी २ ते ५ वर्षापर्यंत सुप्तावस्थेत राहतात. त्यामुळे लक्षणे लवकर दिसून येत नाही. लक्षणे दिसताच वेळेतच औषधोपचार केल्यास कुष्ठरुग्ण १०० टक्के बरा होतो. कुष्ठरोगाच्या प्रसार खंडीत होण्यास मदत होऊन कुष्ठरुग्ण सर्वसामान्य जनतेप्रमाणे समाजात राहू शकतो.एन.जे. गायधने यांनी कुष्ठरुग्णांना सौजन्यशिलता, नम्रता तसेच सर्वतोपरी मदतीची भावना सर्वसामान्य लोकांनी द्यावी ही आजच्या काळाची गरज आहे, असे सांगितले. प्राचार्य देशमुख यांनी आजचा विद्यार्थी उद्याचा देशाचा निरोगी आधारस्तंभ आहे. त्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्याला आरोग्य शिक्षणाची माहिती अवगत होणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग विनामुल्य प्रसार संदेशाचा माध्यम असून एक विद्यार्थी १० लोकांना आरोग्याचा संदेश देवू शकतो, असे सांगितले.प्रास्ताविकातून डॉ.साकोडे यांनी अभिनयाबाबत माहिती देताना सांगितले, ४ आॅक्टोबर पर्यंत चालणाऱ्या १४ दिवसांच्या या मोहिमेत ग्रामीण व शहरी भागातील सर्वस्तरावरून जिल्ह्यातील १२ लाख ९० हजार ८२३ इतक्या लोकसंख्येचा समावेश करण्यात आला आहे. चमूद्वारा कुष्ठरुग्ण शोधून त्यांना विनामुल्य निदान, औषधोपचार व आरोग्य शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती आहे. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी हिरवी झेंडी दाखवून पथसंचलनास सुरुवात केली. संचालन नूरचंद पाखमोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डी.आर. परिहार यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्याचा संकल्प करा
By admin | Updated: September 22, 2016 00:34 IST