शहापूर : हवामानाच्या परिणामामुळे हंगामी पिक उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. याचाच फटका यंदाच्या मिरची उत्पादनावर झाला असून बाजारात लाल मिरचीची आवक घटली आहे. किंमत स्थिर असली तरी मागणीप्रमाणे लाल मिरचीचा पुरवठा कमी दिसत आहे. येथील सुप्रसिद्ध मिरची मार्केटमध्ये फेरफटका मारला असता पाहिजे तशी मिरचीची आवक दिसली नाही. साप्ताहिक बाजाराच्या दिवशी लाखो रुपयाची उलाढाल होत असे. विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातून व्यापारी लाल मिरचीची खरेदी करण्यासाठी येत असत. मात्र यावर्षी अकाली हवामानामुळे मिरचीची आवक घटल्याने व्यापार्यांची संख्या सुद्धा रोडावली आहे. त्याचा परिणाम किमतीवर होऊन पाहिजे तसा लाल मिरचीला भाव मिळत नसल्याचे दिसून येते. बाजारात याबाबत लाल मिरची विकायला आणणार्या शेतकर्यांशी चर्चा केली असता त्यांनी यंदा मिरची पिकविण्याकडे त्यांचा कल नसल्याचे सांगितले. बहुतांश मिरची उत्पादक हिरव्या मिरचीच्या तोड्यावरच अधिक भर देत असल्याचे सांगितले. मिरचीला चांगला भाव मिळत असून लाल मिरचीची परिस्थिती त्याउलट आहे. (वार्ताहर)
लाल मिरचीची आवक घटली
By admin | Updated: May 20, 2014 23:27 IST