गोंदिया : शहरातील भगतसिंह वॉर्डातील राजाभोज कॉलनीत रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, विद्युत ट्रान्सफाॅर्मर अशा विविध समस्यांनी विळखा घातला आहे. या समस्या सोडविण्यासाठी अनेकदा लोकप्रतिनिधींना निवेदन दिले. मात्र, अद्याप त्यांनी या समस्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कॉलनीवासीयांनी समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्याकडे धाव घेतली असून, त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्वरित या समस्या मार्गी न लागल्यास आंदोलन करणार, असा इशाराही कॉलनीवासीयांनी दिला आहे.
राजाभोज कॉलनीत सुमारे ३००-४०० घरे असून १०० च्यावर नवीन घरांचे बांधकाम सुरू आहे. एवढ्या मोठ्या कॉलनीत विद्युत विभागाचा एकच ट्रान्सफाॅर्मर आहे. परिणामी, विद्युत दाब कमी होण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
भर उन्हाळ्यात कूलर, पंखे व घरगुती बोअरवेलचा पंप काम करत नाही. त्यामुळे पाण्याची समस्या उद्भवली आहे. गोंदिया-तिरोडा मुख्य मार्गावरून राजाभोज कॉलनीत जाण्याकरिता एकच मार्ग असून, त्यावर मोठाले खड्डे पडल्याने नागरिकांना ये-जा करण्यास कसरत करावी लागत आहे. शिवाय कॉलनीतील अन्य रस्त्यांची समस्या यापासून वेगळी नसून, नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात यावे. कॉलनीत नाल्या नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच कॉलनी बाहेर ये-जा करण्यासाठी एकमेव अरुंद पूल असून तो जीर्ण झाला आहे.
या पुलावरून ये-जा करणे धोक्याचे झाले असून या पुलाचे त्वरित नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन कॉलनीवासीयांनी आमदार, नगरसेवक, नगराध्यक्ष व संबंधित विभागाला वारंवार दिले. मात्र, त्यांच्या समस्यांची दखल अद्याप घेण्यात आली नाही. अशात कॉलनीवासीयांनी रविवारी (दि. ६) नगराध्यक्ष अशोक इंगळे यांना निवेदन देऊन कॉलनीतील समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात, अशी मागणी केली. निवेदन देताना लोकचंद बिसेन, अशोक टयीकर, गणेश बिसेन, महेंद्र ठाकरे, प्रवीण मुजारिया, दिनेश रहांगडाले, राजीव ठकरेले, तिरथ तिलगाम, अमित मंडल, रोशन भानारकर आदी उपस्थित होते.