पंकजा मुंडे यांचे आश्वासन : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाशी चर्चा, आश्वासनानंतर मोर्चा तुर्तास स्थगितभंडारा : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या नवीन बदली धोरणात काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात येणार आहे. यात प्रशासकीय बदली होणाऱ्या शिक्षकांना दिलेल्या २० पसंतीक्रम गावांची जागा नाही मिळाल्यास पुन्हा रिक्त पदांवर पसंती क्रम देण्याची संधी मिळणार आहे. या सह अन्य मागण्यांचाही आवर्जून विचार करून त्यावर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहे. यामुळे २६ एप्रिलला होणारा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत ना.मुंडे यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना सदर आश्वासन दिले. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसंदर्भात नवीन धोरण बनविण्याचे आश्वासन या माध्यमातून देण्यात आले. पदाधिकाऱ्यांना मिळालेल्या ठोस आश्वासनामुळे उद्या बुधवारला राज्यभरात जिल्हा परिषदेवर प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात येणारा मोर्चा हा स्थगित करण्यात आला आहे.९ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या धुळे येथील संपन्न झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत शासनाने जाहीर केलेले नवीन बदली धोरण, पेंशन योजना, संगणक प्रशिक्षण मुदतवाढ, पदविधर वेतनश्रेणी यासह राज्यातील १५ ते १६ प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे २६ एप्रिलला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून असंतोष व्यक्त करण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चावर राज्यात संपूर्ण नियोजन झाले. राज्यातील शिक्षकांमधील असंतोष पाहून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी २३ एप्रिलला मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीला शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, अप्पासाहेब कुल, आबासाहेब जगताप, रावसाहेब रोहकले, संजय पुंजे, श्रीकृष्ण खेडकर, सोमनाथ तेलुरे, मिलींद गांगुर्डे यांनी नेतृत्व केले. प्रशासनाच्या वतीने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास सचिव असिम गुप्ता, अवर सचिव भालेराव,उपसचिव कांबळे, कक्ष अधिकारी संजय कुडवे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आश्वासन दिल्यामुळे उद्याचा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास जून किंवा जुलै मध्ये राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या बैठकीदरम्यान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी भंडारा जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद, सुधीर वाघमारे, राजेश सूर्यवंशी, दिलीप बावनकर, राजू सिंगनजुडे, नरेश शिवरकर, विकास गायधने, राजन सव्वालाखे, राधेशाम आमकर, विनायक मोथरकर, सुरेश हर्षे, श्रावण हजारे, युवराज वनवे, संजीव बावनकर, अनिल गयगये, राकेश चिचामे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)याबाबत दिले आश्वासनबदली धोरणात बदल करून कुणावरही अन्याय होणार नाही असे धोरण तयार करू, आंतरजिल्हा बदलीमध्ये आपापसात बदल्या करण्यात येईल, महिलांचे वय ५० वर्ष झाल्यावर त्यांची प्रशासकीय बदली होणार नाही, वर्षातून एकदाच एप्रिल अखेर शिक्षकांची सेवानिवृत्ती करणार, प्रशासकीय बदली होणाऱ्या शिक्षकांना पसंतीक्रम गावांची मुभा मिळणार, पदोन्नती करून बदल्यांचे धोरण राबविणार, राज्यांचे रोष्टर एकच करणार, सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षकांची जागा अवघड क्षेत्रातील मागितली तरच त्यांची बदली होणार, तीही त्याने मागितलेल्या गावातच होईल, तसेच तालुक्यात जागा रिक्त असेल तर शिक्षक तालुका बदलवून जाणार नाही, यांचा शासन निर्णयात समाविष्ट करण्याचे आश्वासन ना.मुंडे यांनी दिले.
प्रशासकीय बदलीत २० गावांना पसंतीक्रम
By admin | Updated: April 26, 2017 00:33 IST