लोकसंख्या दिनविशेष : ग्रामीण क्षेत्रात सर्वाधिक वास्तव्य, साक्षरतेचे प्रमाण ८५ टक्के, भंडारा शहरात घनकचऱ्याची समस्या बिकटभंडारा : वाढती लोकसंख्या ही विकासातील मोठा अडथळा आहे. या वाढत्या लोकसंख्येला सोयी सुविधा पुरवण्यिासाठी शहरपातळीवर कोणकोणत्या योजना राबवायला हव्यात, या विषयीचे विश्लेषण करतानाच दुसऱ्या बाजूला वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, शहराचे कसे बकालीकरण होत आहे, यावर ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त घेतलेला आढावा.सन २०११ च्या जनगणनेनुसार भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाख ३३४ एवढी आहे. यात ६ लाख ५,५२० पुरुष, ५ लाख ९४,८१४ महिलांचा समावेश आहे. शहरी भागात २ लाख ३३,८३१, तर ग्रामीण भागात ९ लाख ६६,५०३ लोकसंख्येचा समावेश आहे. साक्षरतेची संख्या ८ लाख ९९,८६० असून ३ लाख ४७४ नागरीक निरक्षर आहेत. महिला-पुरुषाचे प्रमाण ९८२ एवढे आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराच्या लोकसंख्या वाढीचा दशवार्षीक वृध्दीदर भंडारा ७.८, तुमसर ६.८, पवनी १, ठाणा २६, शहापूर ११.२, बेला २८.३, गणेशपूर १२.३, सावरी जवाहरनगर २६.७, चिखला ३.७, वरठी २०.५, साकोली ०.६ तर मुरमाडी २६.६ टक्के आहे. जिल्ह्यातील शहरांचा दशवार्षीक वृध्दीदर ६.४ टक्के आहे. शहरीकरणामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारतो. मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. त्याचरोबर खेड्यांचासुद्धा विकास होत असतो. परंतु विकासाबरोबरच शहरीकरणाची काळी बाजूसुद्धा ठळकपणे दिसून येते. शहरीकरणामुळे सोयीसुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण वाढतो व शहरी वातावरणाचा समतोल बिघडतो. काही शहरी वगळता सर्व शहरांमध्ये सध्याच्या लोकसंख्येला आवश्यक असलेला पाणीपुरवठा, मलनि:सारण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था याची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासते. त्या पुरवतानाच स्थानिक संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळेच वाढीव लोकसंख्येमुळे त्या सोयीसुविधांवर आणखीनच प्रचंड ताण पडणार आहे. या सर्व सुविधांची गरज २०३० पर्यंत कितीतरी पटीने वाढणार आहे. शहरांना भेडसावणारी मुख्य समस्या म्हणजे पाणीपुरवठा, ज्याची मागणी २.५ पटीने होणार आहे. आजच शहरातील जमा झालेल्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योग्य जागा व व्यवस्था उपलब्ध नाही. २०३० पर्यंत घनकचऱ्यामध्ये ५ पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिकच बिकट होणार आहे. दुसरी समस्या म्हणजे रस्ते आणि वाहतूक. मोठ्या शहरातील वाहतूक व्यवस्था घाईगर्दीच्या वेळेमध्ये नेहमीच कोलमडते. खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आजच गर्दीच्या वेळी रस्त्यांवर वाहनांची रांगच रांग लागते. २०३० पर्यंत खासगी वाहनांची संख्या जवळपास दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर आतापासूनच विचार केला नाही तर भयानक परिस्थितीचा सामना करावा लागेल. (नगर प्रतिनिधी)कृषीवर आधारित भंडारा जिल्हाभंडारा जिल्ह्यात ८७८ गावे असून जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६.६५ चौरस कि.मी. आहे. जिल्ह्याचे एकुण भौगोलिक क्षेत्र ३ लक्ष ८४ हजार हेक्टर आहे. जिल्ह्यात पिकाखालील क्षेत्र १ लक्ष ९५,१६८ हेक्टर (खरीप) व ४१,३९७ हेक्टर (रबी) व ५,५०० हेक्टर उन्हाळी क्षेत्र असते. जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असली तरी कृषीपुरक उद्योगांचा वाणवा आहे. जिल्ह्यात दोन साखर कारखाने व सनफ्लॅग स्टील कंपनी, व अशोक लेलँड यांचा समावेश आहे. याशिवाय नोंदणीकृत कारखाने १३९ आहेत. मात्र बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असे कारखाने अजूनपावेतो या जिल्ह्याच्या नशिबी लाभलेले नाही. जिल्ह्यात बेरोजगारांची फौजसन २०११ मध्ये अधिकृतपणे नोंदणी केलेल्या बेरोजगारांची संख्या ७५ हजार ७६६ आहे. हा आकडा शासकीय दप्तरी असला तरी बेरोजगारांची संख्या ३ लाखांच्या वर आहे. बेरोजगारांच्या हातांना काम मिळेल याची शाश्वती जिल्ह्यातील कुठलाच लोकप्रतिनिधी देऊ शकला नाही. निवडणुकीपुरते आश्वासन देण्यापलिकडे या बेरोजगारांच्या पदरात नेहमी निराशा लाभली आहे. बेरोजगार तरुणांचा फौजफाटा जिल्ह्यात असतानाही भंडारा जिल्हा मागासलेला म्हणून ओळखला जातो, हीच या जिल्ह्याची खरी ओळख आहे काय असा संतप्त सवाल सतत भेडसावत असतो. सन २०११ च्या आकडेवारीनुसार मागील लोकसंख्या आकडेवारीच्या अनुषंगाने लोकसंख्येत १४ हजाराने वाढ झाली आहे.
लोकसंख्या वाढली मात्र विकास बेपत्ता
By admin | Updated: July 12, 2015 00:45 IST