भंडारा : उन्हाळी धान खरेदीसाठी जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू ठेवण्याबाबत यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजप शेतकरी आघाडीने दिला आहे. या आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्यांमार्फत पाठविण्यात आले आहे. खरीप हंगामातील धान पिके हे आसमानी संकटामुळे व सुलतानी संकटात सापडल्याने पिकांची नासाडी होवून शेतकर्यांच्या पदरात काहीच पडले नाही. जे काही पडले ते रासायनिक खते, किटकनाशके, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी व सणासुदीसाठी अत्यल्प व कवडीमोल दराने व्यापार्यांच्या घशात पडले. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शासनाच्या उदासिन धोरणामुळे आधारभूत धान्य खरेदी केंद्र उशिरा म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आली होती. त्यामुळे शासनाने निर्धारित केलेल्या हमी भावाचा लाभ पाच टक्के शेतकर्यांनाही झाला नाही. इतकेच नव्हेतर शासनाने घोषित केलेले २०० रूपये प्रति क्विंटल बोनसचा लाभळी शेतकर्यांना घेता आला नाही. एकंदरीत धानाच्या आधारभूत किंमतीचा व बोनसच्या लाभापासून या जिल्ह्यातील शेतकरी वंचितच राहिला आहे. शेतकर्यांनी मोठ्या उत्साहात उन्हाळी धान पिक लावले. उत्पादन हातीयायला लागले आणि शासनाची आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याचा फतवा काढला. हे एकंदरीत शेतकर्याच्या हिताविरूद्धचे निर्णय असल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये शासनाविरूद्ध असंतोष व आक्रोष निर्माण झाला आहे. शेतकर्यांचे हित लक्षात घेता उन्हाळी धानाची खरेदी ही आधारभूत किंमतीने धान्य खरेदी केंद्रामार्फतच खरेदी करावे. त्यासाठी आधारभूत धान्य खरेदी केंद्रे पुर्ववत सुरू करावे. अन्यथा भाजप शेतकरी आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आलेला आहे. (शहर प्रतिनिधी)
धान खरेदी केंद्र सुरू ठेवा
By admin | Updated: May 23, 2014 23:39 IST