मुकेश देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कशीर्षक वाचून दचकलात काय? दचकू नका, हे सत्य आहे. कारण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा शासनाने १५ मे पासून उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्याचा मुहूर्त शासनाने निश्चित केला आहे. मात्र, संपूर्ण भंडारा- गोंदिया या धानाच्या जिल्ह्यात धान मळणीला २० एप्रिलपासूनच सुरुवात झालेली आहे. धान खरेदी केंद्र सुरु होण्यास तब्बल २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात खाजगी व्यापाऱ्यांना उत्पादीत धान विकणे सुरु केले आहे. धान खरेदी केंद्र सुरु होण्याच्या दिवसापर्यंत शेतकऱ्याकडील सर्व धान व्यापाऱ्यांकडे राहील व व्यापाऱ्यांसाठीच धान खरेदी केंद्राचे विधीवत उद्घाटन करुन खरेदीचा शुभारंभ करण्यात येईल यात दुमत नाही. बळीराजाने नव्या जोमाने उन्हाळी धानपिकाची लागवड केली. पिकही बऱ्यापैकी चांगले उत्पादन देत असल्याने खरीपात झालेले नुकसान भरुन निघेल या भोळ्या आशेवर शेतकऱ्यांनी कसून मेहनत केली. मात्र शासन शेतकऱ्यांनी कसून मेहनत केली. मात्र शासन व लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या धोरणामुळे अजूनपर्यंत उन्हाळी धान खरेदी सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांना आपले धानपिक आधारभूत किमतीपेक्षा ४०० रुपये प्रति क्विंटल कमी दराने खाजगी व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकावे लागत आहेत. प्रति क्विंटल ४०० रुपयांचा तोटा म्हणजे जेमतेम उत्पादन खर्च सुध्दा निघेल की नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहे.शासन व शासनाचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्याला धान विकू नका आधारभूत केंद्रातच धान विका असे वारंवार सांगतात मात्र, धानाची साठवणूक करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात गावतपाळीवर कुठेही साठवणूक केंद्राची उपलब्धता करुन देत नसल्याने खाजगी व्यापाऱ्यांकडे धान विकल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहत नाही.उन्हाळी धानपीक हे एप्रिलच्या पंधरवाड्यापासून मळणीला येत असतात याची पुरेपुर कल्पना शासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना सुध्दा असते तरीपण १५ मे पासून उन्हाळी धान खरेदीचा शुभारंभ करण्यामागे काय हेतू असावा? असा प्रश्न निर्माण होतो. मागील तीन वर्षांचा विचार केला असता असे लक्षात येते की फक्त १० टक्के शेतकऱ्यांनीच धान खरेदी केंद्रावर जावून स्वत:चे धान विकले उर्वरित सर्व धान हे खाजगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर दिले असल्याचे बोलले जात आहे.ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर धान विकले नाही. अशा शेतकऱ्यांना खाजगी व्यापारी सातबारावर धान देण्याच्या मोबदल्यात कमीशन देत असल्याचीही माहिती आहे. आणि शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना सातबारे दिले तर बिघडले कुठे किमान नुकसान झालेल्या चा मोबदला म्हणून काही रुपये खाजगी व्यापाऱ्यांकडून मिळतील याकरिता शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना आपलेकडील सातबारे देत असतो. निवडणुका आल्या की राजकीय पुढारी शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करीत असतात. मात्र निवडणुकीनंतर पुढाऱ्यांचे तोंडही दिसत नाही. १ मे पासून धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश खरेदी-विक्री व राईसमिल असोसिएशनला दिले आहेत त्यांनी अजूनपर्यंत धान खरेदी सुरु का केले नाही. याबाबत चौकशी केली जाईल. ताबडतोब धान खरेदी केंद्र सुरु करण्यात येईल.-एच. एल. पवार, जिल्हा मार्केटिंग अधिकारीउन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यासंबंधाने जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून कोणतेही पत्र अजूनपर्यंत प्राप्त झालेले नाही. उद्याला खरेदी-विक्री संघाची बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीत निर्णय घेऊन लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरु करण्यात येतील.-अरुण गभणे, खरेदी-विक्री उपसभापती लाखांदूर
व्यापाऱ्यांसाठी सुरू होणार धान खरेदी केंद्र !
By admin | Updated: May 13, 2017 00:17 IST